कराड : पुणे-बंगलुरु महामार्गावर कराडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाचे सेगमेंट बसवताना तो कोसळून दुर्घटना घडली. शनिवारी (दि. १५) झालेल्या अपघातात दोन कर्मचारी जखमी झाले तर, एकच खळबळ माजून घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने महामार्गावरील वाहतुकीचे तीनतेरा उडाले.
नरेंद्र सिंग (वय २८) आणि दिनेश सिंग (वय २९) अशी जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे असून, त्यांच्या पायाला मार बसला आहे. तर, कोसळलेल्या सेगमेंट तब्बल ३३ टन असल्याचे सांगण्यात येते. ही दुर्घटना भीषण होती. त्यात सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक नेते दादा शिंगण हे तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी गर्दी निवळण्यासह वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत केली. अनुभवी तंत्रज्ञ, अधिकारी वा जबाबदार व्यक्ती या वेळी हजर नसल्याने मनाला वाटेल तसे काम सुरू असल्याने ही धक्कादायक घटना घडल्याचा आणि ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणाचा कळस झाला असा आरोप शिंगण यांनी केला आहे.
दरम्यान,स्टेटमेंट कोसळला तेव्हा आसपास अन्य कर्मचारी व नागरिक नसल्याने मोठी दुर्घटनात टळली. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी गर्दी झाल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी होवून प्रचंड गोंधळ उडाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे- बंगलुरु महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये कराड ते नांदलापूर या सहापदरी मोठ्या लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
यांतर्गत शनिवारी कोल्हापूर नाका येथे उड्डाणपुलावर सेगमेंट बसवण्याचे काम सुरू होते. सेगमेंट बसवण्यासाठी सेगमेंट लॉन्चर मशीन फिट केल्यानंतर ३३ टन वजनाचा सेगमेंट ग्राउंड फ्लोअरला ठेवण्यात आला. यावेळी सेगमेंट लॉन्चर मशीनचा ऑपरेटर आणि अन्य कर्मचारी सेगमेंटवर उभे होते. त्यानंतर लॉन्चर मशीनने सेगमेंट उचलण्यास सुरुवात केली. मशीनने सेगमेंट उचलताना तो निसटून खाली कोसळला. दरम्यान, सेगमेंटवर उभे असलेल्या दोघांनी खाली उड्या टाकल्या. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेवेळी सदरच्या कामावर असणारे अन्य कर्मचारी व आसपासचे नागरिक त्याठिकाणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
दरम्यान, सेगमेंट खाली कोसळल्यामुळे जोरदार आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महामार्गावरून प्रवास करणारे अनेक वाहनचालकही त्याठिकाणी थांबले होते. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.