अखिल भारतीय वकिल परीषद ( ऑल इंडिया बार कौन्सिल) तसेच महाराष्ट्र व गोवा वकिल संघटनेचे ( महाराष्ट्र अँड गोवा बार असोसिशन) माजी अध्यक्ष, नामवंत ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. धैर्यशील पाटील यांचे आज बुधवारी ( दि.१४) अल्पशा आजाराने साताऱ्यातील राहत्या घरी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.

फौजदारी दाव्यातील निष्णात वकिल म्हणून त्याची ख्याती होते. वकिल वर्गात डी. व्ही. आणि आप्तेष्टांमध्ये ते दादा म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे मागे पत्नी ॲड. दीपा पाटील. ॲड. सिध्दार्थ पाटील व सातारचे माजी नगराध्यक्ष निशांत पाटील हे दोन पुत्र, मुलगी नताशा शालागर, सूना, नातवंडे असा परिवार आहे. पेठ ( ता. वाळवा ) हे त्यांचे मूळ गाव असून, स्वातंत्र्यपूर्व काळात संयुक्त सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचे वडील प्रसिध्द विधीज्ञ ॲड. व्ही. एन. पाटील हे जिल्हयाच्या ठिकाणी स्थायीक झाले. डाव्या चळवळीत योगदान देताना ॲड. व्ही. एन. पाटील यांनी शेतकरी, कष्टकरी जनतेच्या न्याय हक्कांसाठी अवघे आयुष्य वेचले. सातारकरांनी त्यांना दोनदा विधानसभेत निवडून दिले. हाच वैचारिक व निष्णात वकिलीचा वारसा धैर्यशील पाटील यांनी जोपासला. सातारचा बहुचर्चित शरद लेवे खून खटल्यात त्यांनी उदयनराजे भोसले यांची तर कराडचे पहिलवान, महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या खून खटल्यात त्यांनी माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र ॲड. उदयसिंह उंडाळकर वकिल म्हणून हे खटले जिंकले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा अनेक खटल्यात त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ ते वकिलीबरोबरच कष्टकरी, शेतकरी व वकिलांच्या प्रश्नांवर ते सतत लढत राहिले. अनेक परिषदांमध्ये त्यांची व्याख्यानेही महत्त्वपूर्ण ठरली. प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर संगम माहुली येथील स्मशानभूमीत सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.