गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बऱ्याचदा दिल्लीला जाऊन आले आहेत. त्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका होते आहे. मुख्यमंत्री वारंवार दिल्लीला का जातात, असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात येतो आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यातील प्रलंबित प्रश्न आणि राज्यात येणाऱ्या प्रकल्पांसंदर्भात त्यांचा हा दिल्ली दौरा आहे. आज पंतप्रधान मोदींबरोबर त्यांची भेट होणार आहे. आज पंतप्रधानांना भेटून वेदान्तासारखाच किंवा त्यापेक्षा मोठा दुसरा प्रकल्प महाराष्ट्राला द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळे वेदान्तासारखाच किंवा त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर

“वेदान्ताच्या वादात मी सध्या जाणार नाही. पण दोन अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते. या अडीच वर्षात त्यांनी एमओयू का केला नाही. गेल्या अडीच वर्षात मुख्ममंत्री हे मंत्रालयातही आले नाहीत. मुळात राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येण्याच्या आधीच वेदान्ताने आपला प्रकल्प गुजरातला नेण्याचे ठरवले होते”. असे ते म्हणाले.

“न्यायालयाचा निर्णय दोघांनाही मान्य असावा”

दरम्यान, दसरा मेळाव्याच्या जागेवरून सुरू असलेल्या वादावरही शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा विषय न्यायालयात आहे. न्यायालयाचा निर्णय दोन्ही पक्षाला मान्य असायला हवा. आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. नेहमीप्रमाणे सदा सरवणकर हे दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागत होते. त्याप्रमाणे त्यांनी मनपाकडे अर्ज केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली हा दसरा मेळावा होणार असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे. मात्र, अद्यापही मनपाने याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आम्ही पर्यायी व्यवस्था करून ठेवली आहे. आम्हाला जिथे परवानगी मिळाली आहे. तिथे आम्ही उत्साहात दसरा मेळावा करू”, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पक्षप्रमुखांवर ही वेळ का आली?”

“इतक्या वर्षात कधीही दसरा मेळाव्यासाठी आमदारांना फोन येत नव्हते. मात्र, आता दसरा मेळाव्यासाठी पक्षप्रमुखांना मुंबईतल्या गटप्रमुखांना मेळावा घ्यावा लागतो. ही वेळ का आली याचा विचार त्यांनी करावा. मुंबई आमचीच आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. मला एवढंच सांगायचं आहे, की शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यात ग्रामंपचायत, नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या यात शिंदे गटाच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचे जो प्रयत्न केला आहे, त्याला लोक मतदानातून समर्थन देत आहेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.