महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा चालू आहेत. तसेच आघाडीतल्या पक्षांनी त्यांचे उमेदवारही निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. मविआत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? तसेच कोणकोणत्या नेत्यांना लोकसभेचं तिकीट मिळणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. शरद पवार गटाने आज (७ मार्च) लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला हजेरी लावून स्वतः शरद पवार यांनी लोणावळ्यासह मावळमधील त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

शरद पवार म्हणाले, भारतीय जनता पार्टी देशभर सत्तेचा गैरवापर करत आहे. त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं आहे. आता ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामागे लागले आहेत. केजरीवाल यांना क्राईम ब्रँचने आठवं समन्स धाडलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक करण्याची भाजपाने योजना आखली आहे असं चित्र पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात अनिल देशमुखांना सहा महिने तुरुंगात डांबून ठेवलं होतं. देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले. त्यानंतर त्यांना सहा महिने तुरुंगात डांबण्यात आलं. शेवटी न्यायालयाने त्यांना मुक्त केलं. त्यावेळी सांगण्यात आलं की, देशमुख यांनी एक कोटी रुपयांची देणगी स्वीकारली होती. एका महाविद्यालयाची इमारत बांधण्यासाठी देशमुखांनी धनादेशाच्या माध्यमातून देणगी घेतली होती.

अनिल देशमुखांप्रमाणे भाजपावाल्यांनी ‘सामना’चे (शिवसेनेच्या ठाकरे गटाचं मुखपत्र) संपादक आणि ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनाही चार महिने तुरुंगात डांबलं होतं. कारण राऊत हे सामनातून भाजपावर टीका करतात. या देशात बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही. आपल्या देशात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींपासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत अनेक पंतप्रधान आणि मोठे नेते झाले. परंतु, एखाद्या लेखकाने किंवा संपादकाने टीका केली म्हणून त्याला कोणी तुरुंगात टाकलं नाही.

हे ही वाचा >> “…तर शरद पवार म्हणतात मला’, पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा; म्हणाले, “मी त्या वाटेने गेलो तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार म्हणाले, भाजपा देशात लोकशाही आणि संविधानाची पायमल्ली करत आहे. त्याविरोधात आपण एकत्र आलं पाहिजे. अन्यथा सामान्य माणसाचे अधिकार हिरावले जातील. त्यामुळे दोन गोष्टींसाठी आपल्याला वाट्टेल ते करावं लागेल आणि जागृत राहावं लागेल. मूलभूत लोकशाहीचं स्वातंत्र्य आणि देशाच्या घटनेचं संरक्षण करणं हे तुमचं, माझं आणि सर्वांचं काम आहे. त्यासाठीच मी, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि आमचे काही मित्रपक्ष एकत्र आलो आहोत. लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठीच आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. नुकतीच आमची (मविआ) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आम्ही काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात आम्ही सर्व उमेदवारांची निवड आणि इतर गोष्टी ठरवू. लवकरच या गोष्टी तुमच्यासमोर जाहीर केल्या जातील. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी शक्ती उभी करणं ही तुमची जबाबदारी आहे.