Sharad Pawar on Hindi Language Row: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य असावी की ऐच्छिक असावी? हिंदी भाषा या वयोगटाला शिकवली जावी की न जावी? या मुद्द्यांवर सध्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने आधी पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावर सामाजिक व राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर त्यात वेळोवेळी बदल केले. आता उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून दोन्ही ठाकरेंनी मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चामध्ये सहभागी होणार किंवा नाही, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे.

कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवारांनी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत असणाऱ्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात महाराष्ट्रातील सध्याची हिंदी सक्ती व त्यावर राजकीय वर्तुळातून होणारा विरोध, याबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी पहिली ते चौथी या वयोगटासाठी हिंदी सक्ती करणं योग्य नाही, असं मत मांडलं आहे.

हिंदी सक्तीबाबत काय म्हणाले शरद पवार?

“पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती करणं योग्य नाही. पण पाचवीनंतर हिंदी येणं त्या विद्यार्थ्याच्या हितासाठी आवश्यक आहे. देशात ५५ टक्के लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी नाही जी एवढे लोक बोलतात. त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. महाराष्ट्रात लोक हिंदीच्या विरोधात नाहीत. पण पहिली ते चौथी या वयोगटाच्या डोक्यावर आत्ताच नवीन भाषा लादणं योग्य नाही. तिथे मातृभाषा महत्त्वाची आहे”, असं शरद पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे व राज ठाकरेंबाबत शरद पवारांची भूमिका काय?

गुरुवारी उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोघांनी स्वतंत्र पत्रकार परिषदांमध्ये वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा केली. उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात काढल्या जाणाऱ्या एका मोर्चाला पाठिंबा दिला तर राज ठाकरेंनी कोणत्याही राजकीय झेंड्याशिवाय पूर्णपणे जनतेचा व सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा काढण्याचं आवाहन केलं. तसेच, “नेहमी राजकीय लोक मराठीच्या मुद्द्यावर बोलत असतात, आता या मोर्चात कोण कोण सहभागी होतंय ते मला बघायचं आहे”, असं राज ठाकरे म्हणाले होते. यासंदर्भात आज कोल्हापुरात शरद पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर भूमिका मांडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दोन्ही ठाकरेंची विधानं मी वाचली. मी मुंबईला गेल्यावर त्यांचं म्हणणं समजून घेणार आहे. त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले आहेत. त्यांनी हेही जाहीर केलं की त्यात विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं. त्यासाठी त्यांचं नेमकं धोरण समजून घ्यावं लागेल”, असं शरद पवार म्हणाले. “कुणीही सांगतो तुम्ही यात सहभागी व्हा, अशी भूमिका घेता येणार नाही. पण त्यांचा मुद्दा जर महत्त्वाचा असेल, राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि मग त्यावर योग्य तो निर्णय घेणं आवश्यक आहे. पण एकंदरीत मला वाटतं सरकारने पहिली ते चौथी मराठीचा हट्ट धरू नये”, असं शरद पवार म्हणाले.