सरकारला काही अडचण आली तर परदेशातून आयात करण्याची भुमिका हे सरकार घेतं पण आपल्या शेतकऱ्यांना दोन पैसे देण्याची भूमिका यांची नाही. तर आत्महत्येच्या वाटेवर जाण्याची अपेक्षा ठेवायची या पध्दतीने कोणी शेतकऱ्यांकडे बघत असेल तर अशांना सत्तेतून हटवण्याशिवाय पर्याय नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नांदेड येथील जाहीर सभेत सरकारला दिला.  काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांच्या भल्यामध्ये आजच्या सरकारला रस नाही. हे सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाही तर कंपन्यांचे कर्ज माफ करतेय जो भुक भागवतोय त्यांना कर्जमाफी नाही अशा शब्दात शरद पवारांनी सरकारवर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवछत्रपतींच्या नावे सत्तेत आलेले हे सरकार महाराजांविषयी काहीच करत नाहीत. डॉ. आंबेडकरांविषयी काहीच करत नाही केवळ नावाचा वापर हे सरकार करत आहेत. छत्रपतींनी परकियांपासून राज्याचा बचाव होण्यासाठी किल्ले बांधले. हे किल्ले नव्या पिढीसाठी प्रेरणा देणारी केंद्र आहेत. पण या सरकारने गडकिल्ल्यांवर छमछम बघण्याची व्यवस्था केली आहे. महाराष्ट्राचा इतिहास बाजुला ठेवून एक चंगळवादाची संस्कृती राज्यात प्रस्थापित करण्याचे काम हे सरकार करत आहेत. अशांना थारा आपली जनता देणार नाही असा स्पष्ट इशाराही सरकारला दिला.

या राज्यात आणि देशात ६५-६६ टक्के लोक शेती करतात. आज चित्र हे वेगळेच दिसतेय. कर्जबाजारी झालेला सर्वात मोठा वर्ग लाखांचा पोशिंदा आणि दोन वेळेचा भुकेचा प्रश्न जो सोडवतोय तो संकटात आहे. आपल्याकडे १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, विहीरीसाठी कर्ज काढलं जातं परंतु पीक उध्वस्त होतं पण डोक्यावरच कर्ज मात्र कमी होत नाही. त्यावर बॅंक नोटीस काढते जप्तीची आणि अपेक्षा करते सहकार्याची असेही शरद पवार म्हणाले.

मोठ्या उद्योगपतीनी कर्ज थकवलं तर बॅंका त्यांना सवलती देतात. काही दिवसापूर्वी धंद्यात उद्योगातून पैसे परत आले नाहीत तर सरकारने ८६ हजार कोटी बॅंकेत भरले. पण आम्ही ७१ हजार कोटींचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं. एकेकाळी धान्य आयात करणारा देश आज जगात तांदूळ निर्यात करणारा पहिल्या क्रमांकावर आहे. गहू निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे अशी राज्याची सद्यस्थिती शरद पवार यांनी जनतेसमोर मांडली.

आज देशात लाखो तरुण बेकार आहेत. नाशिकमध्ये अनेक कारखाने असतानाही आर्थिक मंदीमुळे ५४ कारखाने बंद पडले आणि १६ हजार तरुण बेरोजगार झाले आहेत. आधीच बेकारी त्यात ज्यांच्या हाती काम आहे त्यांना बेकारीला सामोरे जाव लागतंय. यामुळे आज तरुणांची लग्न होत नाहीत याबाबतीत काय करतय हे सरकार असा संतप्त सवालही शरद पवार यांनी सरकारला केला. मुंबईत पाहिले असता १२० कापड गिरण्या होत्या त्यातील केवळ १० गिरण्या सुरु आहेत. मुंबईतील गिरणगाव गेलं. त्याठिकाणी आज मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत पण त्याठिकाणी गिरणी कामगाराला जाण्याची परवानगी नाही. संपुर्ण गिरण गाव उध्वस्त झालं आहे असेही शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar taking about bjp and shivsena in nanded nck
First published on: 19-09-2019 at 17:02 IST