शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रेप्रकरणाच्या निकालाचं लेखन करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात २१ जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागितला होता. पण, सर्वोच्च न्यायालायनं राहुल नार्वेकरांना थोडासा दिलासा दिला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी १० जानेवारीची मुदत राहुल नार्वेकरांना न्यायालयानं दिली आहे. यावर शिवसेना ( शिंदे गट ) आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अधिवक्ता तुषार मेहता यांनी राहुल नार्वेकरांच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयाकडे तीन आठवड्यांचा वेळ मागितला. तर, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी अध्यक्षांकडून वेळकाढूपणा होत असल्याचा युक्तिवाद केला होता. पण, सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकरांना १० जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे.

“विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या मुदतवाढीचं स्वागत करतो, पण…”

यावर विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना ( शिंदे गट ) आमदार भरत गोगावले म्हणाले, “अपात्रतेचा निर्णय आमच्या बाजुने लागावा. कारण, आमच्याकडे संख्याबळ आहे. अपात्रतेप्रकरणात चांगला निकाल येईल. सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या मुदतवाढीचं स्वागत करतो. पण, निर्णय दूध का दूध पाणी का पाणी होईल, याबद्दल शंका नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अध्यक्षांची भूमिका सुसंगत नाही”

मुदतवाढीवरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी राहुल नार्वेकरांवर टीका केला आहे. “अध्यक्षांची भूमिका लक्षात घेता त्यांना हे प्रकरण प्रलंबित ठेवायचं आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अध्यक्ष निर्णय देऊ शकत नाहीत. याचा अर्थ त्यांची भूमिका सुसंगत नाही,” असं भास्कर जाधवांनी म्हटलं.