गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितल्यानंतर या वादाला तोंड फुटलं. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर टीका केली जात आहे. तर बोम्मई यांच्याकडून सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत,त्यामुळे त्यांना 'कुलूप' ही निशाणी द्यायला हवी, अशी मागणी राऊतांनी केली होती. राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांसारख्या लोकांना भविष्यात 'चमचा' ही निशाणी मिळाली पाहिजे, अशी मागणी प्रतापराव जाधव यांनी केली. ते बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हेही वाचा- चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा; सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका, म्हणाल्या, “गृहमंत्र्यांच्या मर्जीप्रमाणे…” संजय राऊतांच्या टीकेबाबत विचारलं असता प्रतापराव जाधव म्हणाले, "सीमाप्रश्नी आमच्या भावना तेवढ्याच तीव्र आहेत. स्वत: एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकमध्ये जाऊन मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आंदोलन केलं होतं. यामुळे त्यांना ४० दिवस तुरुंगवासही भोगावा लागला. त्यांनी पोलिसांचा मार खाल्ला आहे. कर्नाटकमधील मराठी बांधवांसाठी आमच्या भावना तीव्र आहेत. कारण आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत." हेही वाचा- “…हे अतिशय दुर्दैवी आहे”, शिंदे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया "संजय राऊत आणि ती उबाठा सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन करण्यामध्ये वेळ घालवत आहेत. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चमचेगिरी करण्यात वेळ घालवत आहेत. त्यामुळे संजय राऊतांसारख्या लोकांना भविष्यात 'चमचा' ही निशाणी मिळाली पाहिजे, अशी मागणी आम्ही निश्चितपणे निवडणूक आयोगाकडे करणार आहोत," असंही प्रतापराव जाधव म्हणाले.