१९ जून हा शिवसेनाचा वर्धापन दिन आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पक्षात दोन गट पडले आहे. बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच वर्धापन दिन असणार आहे. वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने वर्धापन दिनाचा टीझरही लॉन्च केला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडलं.
शिंदे गटाने वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा, असा खोचक सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला. शिंदे गटाच्या गद्दारीची नोंद जगातील ३३ देशांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करून, त्यांनी किती निर्लज्जपणे गद्दारी केली होती, हे लोकांना दाखवून द्यावं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी टीकास्र सोडलं.
दोन्ही गटाकडून वर्धापन दिनाच्या सुरू असलेल्या तयारीबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “वर्धापन दिन आम्हीच साजरा करणार आहोत. दुसरीकडे ज्यांची हकालपट्टी झाली आहे. सगळीकडून ‘रिजेक्ट’ झालेला माल आमचा वर्धापन दिन कसा काय साजरा करू शकतो. त्यांनी (शिंदे गट) ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा. कारण जगातील ३३ देशांनी त्यांच्या गद्दारीची नोंद घेतली आहे. तोच दिवस त्यांनी साजरा करावा. त्यांनी किती निर्लज्जपणे गद्दारी केली, हे त्यांनी लोकांना दाखवून द्यावं.”
हेही वाचा- “…म्हणून केसरकरांनी मला ऑफर दिली असेल”, जुना किस्सा सांगत अजित पवारांची प्रतिक्रिया
खरं तर, उद्या (रविवारी) वरळीत ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबीर आहे. या शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या शिबिराला उद्या राज्यभरातून अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे कामाची पाहणी करण्यासाठी वरळीत आले होते. यावेळी त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला.