चिपळूण – विधानसभेच्या निवडणुकीला जर शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केले नसते तर काय परिस्थिती झाली असती हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाही माहिती आहे. निवडून आलेल्या उमेदवारांना ही माहिती आहे, आणि आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे, असा टोला त्यांनी चिपळूण येथील आमदार शेखर निकम यांना लगावला.
कोकणात नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर चिपळूण येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेचे नेते पालकमंत्री उदय सामंत महायुतीमधील रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा व राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडे बोल सुनावले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार हे महायुती म्हणून निवडणुका लढवायच्या आहेत असं सांगत असतानाच महायुतीमधीलच काही पिल्लावळ महायुती होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतील तर माझी शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की, शिवसेना काय आहे हे तितक्याच आक्रमकपणे दाखवून देण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे. अशा शब्दात उदय सामंत यांनी जिल्ह्यातील महायुतीमधील काही पदाधिकाऱ्यांच्या समाचार घेतला आहे. जर कोणाला खूमखुमी असेलच तर आपल्या धनुष्यबाण कसा चालतो हे त्यांना दाखवावे लागेल अशा शब्दात सामंतांनी सुनावले आहे.
चिपळूणमधील महायुतीमधील काही म्हणत आहेत की, आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्ही जिंकलेलो आहोत, आमच्याकडे ही संस्था आहे. आमच्याकडे ती संस्था आहे, आमच्याकडे तीस हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आहोत. तर काही म्हणतात, शाळांमधून २८ हजार जणांपर्यंत पोहोचलो आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आहे. पण जर कोणाला खूमखुमी असेलच तर आपल्या धनुष्यबाण कसा चालतो हे त्यांना दाखवावे लागेल अशा शब्दात सामंतांनी सुनावले.
अलीकडेच काही दिवसापूर्वी महाविकास आघाडी मधून विधानसभेला निवडणूक लढवलेले प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांनाही सामंतांनी खडे बोल सुनावले आहेत. काही लोकांना पंधरा दिवसांपूर्वी शिंदे साहेब त्यांना चांगले होते माझ्याबरोबर माझे मोठे बंधू किरणभैया सामंत यांच्याबद्दलही आपुलकी प्रेम होत पण काही मंडळींनी सांगितलं की, त्यांची चौकशी लागेल म्हणून ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले की चौकशी लागलेली थांबवण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेले ते मला माहिती नाही. पण ठीक आहे, तुमचं काय वैयक्तिक राजकारण आहे त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही पण शिवसेनेला डिवचण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर शिवसेना काय आहे, हे दाखवण्याची जबाबदारी तुमची आणि आमची सगळ्यांची आहे असे सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांनाही टीका करणाऱ्यांना आक्रमक शैलीत उत्तर देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. आपल्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे सांगतात की, महायुती म्हणून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीनेच निवडणुका लढवायचे आहेत असं सांगत आहेत उपमुख्यमंत्री अजित दादा ही महायुती करायचं सांगत आहेत शिंदे साहेबांनी परवा रत्नागिरीमध्ये आपल्याला महायुतीचाच भगवा फडकवायचा आहे असे सांगितले आहे. मीही महायुतीच्या समन्वय समितीमध्ये आहे. मात्र स्वबळाची भाषा करायची की, महायुतीमध्ये लढायचे हे बोलण्याचा अधिकार मला नाही आणि काल-परवा महायुतीमध्ये बाहेरून आलेल्याना तर नाहीच नाही अशा शब्दात उदय सामंत यांनी चिपळूण येथील बैठकीत महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या समाचार घेतला आहे.