राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असतं असं विधान  राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर भाषणामध्ये केलं आहे. विशेष म्हणजे शरद पवार मंचावर बसलेले असतानाच यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. असं असतानाच महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री पद असणाऱ्या शिवसेनेनं या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळेच शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमधील धुसपूस थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलं काय?
शरद पवार हे रविवारी अमरावती दौऱ्यावर होते. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवारांबरोबरच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूरांसहीत इतर नेतेही उपस्थित होते, या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलतांना मुख्यमंत्री पदाबाबद मोठं वक्तव्य केलं.

यशोमती ठाकूर काय म्हणाल्या?
“शरद पवारांसाठी काय आणि किती बोलावं. छोट्या तोंडी मोठा घास घेतेय पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचं चित्र अजून वेगळं असतं,” असं यशोमती ठाकूर म्हणाल्यानंतर काही उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर पुन्हा बोलताना, “टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. पावरांसाठी जोरात टाळ्या वाजवा,” असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

नक्की वाचा >> पवारांच्या घरावरील हल्ल्याला भाजपाची फूस असल्याचा शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “माकडांची माणसं झाली पण काही…”

कोणी कितीही तीर मारले तरी…
“चार वेळा पवार मुख्यमंत्री झाले पण आज काळाची गरज आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडी झाली तेव्हा पवार मला म्हणाले होते मी ऐकलं तुझं टीव्हीवर. मला कोणी काही सांगितलं नव्हतं. पण पवार या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत आहेत. आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कोणीही कितीही काहीही तीर मारले तरी महाराष्ट्रातील सरकार स्थीर राहणार असं या ठिकाणी मी सांगते,” असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं.

शिवसेनेनं दिलं उत्तर…
यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका मांडताना पक्षाच्या प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एक व्हिडीओ प्रतिक्रिया रात्री पावणे अकराच्या सुमारास जारी केली. यामध्ये नीलम गोऱ्हे यांनी खोचकपद्धतीने शिवसेनेच्या राष्ट्रवादीला टोला लगावलाय. “आज नामदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये असं विधान केलं आहे की, शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर वेगळं चित्र दिसलं असतं. शरद पवार यांच्या कार्यक्षमता आणि नेतृत्वाबद्दल कुठली शंकाच नाहीय,” असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

नक्की पाहा >> सिल्व्हर ओक आंदोलन Video: पोलीस कर्मचारी आंदोलनकर्त्या महिलेला धक्का देत असतानाच सुप्रिया सुळेंनी तिचा हात पकडला अन्…

यशोमती ठाकूर यांना विचारला प्रश्न…
तसेच पुढे बोलताना, “मला तर वाटतं त्यांना युपीएचं अध्यक्ष करावं, म्हणजे सगळ्या भारतालाच उपयोग होईल,” असा टोला नीलम गोऱ्हेंनी लागवला आहे. त्याचप्रमाणे, “यशोमतीताई तुम्ही असा प्रस्ताव द्याल का?” असा प्रश्नही त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिलेल्या प्रतिक्रियेच्या शेवटी विचारलाय.

पवार युपीएच्या अध्यक्षपदाबद्दल काय म्हणाले?
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षपदाची सातत्याने चर्चा होत असली तरी, ‘हे पद स्वीकारण्याची माझी तयारी नाही. ‘यूपीए’मध्ये असलेली विद्यमान व्यवस्थाच कायम राहिली पाहिजे’, असे शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे. दोन आठवड्यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दिल्लीत झालेल्या कार्यक्रमामध्ये पवारांनी ‘यूपीए’चे अध्यक्ष व्हावे, असा ठराव पवार यांच्या उपस्थितीत संमत केला होता. मात्र, काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे ‘यूपीए’चे अध्यक्षपद कायम राहणार असल्याचे पवार यांनी सूचित केले. बिगरभाजप पक्षांनी एकत्र येण्यासंदर्भात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आग्रही असून त्यांच्याशी चर्चा करू, असेही पवार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena replied to yashomati thakur saying picture of maharashtra would have been different if sharad pawar was cm scsg
First published on: 11-04-2022 at 11:23 IST