ममता बॅनर्जी एकहाती एका पायावर लढल्या. त्यांचे अभिनंदन करणाऱ्या भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धमकीवजा इशारा दिला. अशा पद्धतीने धमक्या देऊन भाजपा आपली उरलीसुरली पत का घालवीत आहे? अशी विचारणा शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे. विजयाबद्दल अभिनंदन करणाऱ्यांना धमकावणे, तुरुंगात टाकणे या असहिष्णुतेस महाराष्ट्र धर्मात तरी स्थान नाही. भाजपा महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास त्यांची ही असहिष्णुताच जबाबदार आहे! भाजप नेत्यांचा ‘अॅरोगन्स’ म्हणजे मस्तवाल भाषा हे त्यांच्या बंगालमधील दारुण पराभवाचे एक कारण आहे. महाराष्ट्रातील सदैव गुरगुरणाऱ्या लोकांनी याचे भान ठेवले तर बरे होईल असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. त्यात काय चुकलं? पाकिस्तानात सत्तांतर होते तेव्हा पंतप्रधान मोदीही पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचे अभिनंदन करतात. हा एक राजशिष्टाचार आहे, पण भुजबळांनी ममतांचे अभिनंदन केल्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना इतका राग आला की, त्यांनी भुजबळांना ते जामिनावर सुटले असल्याची आठवण करून दिली. पाटलांनी भुजबळांना इतर बऱ्याच धमक्या आणि इशारे दिले. थोडक्यात काय, तर भुजबळांनी गप्प बसावे. नाहीतर त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची क्षमता आपल्यात आहे, असे पाटील यांना सुचवायचे आहे का? हा एकप्रकारे न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रकार आहे. श्री. भुजबळ हे पाटलांना उत्तर देण्यास समर्थ आहेत, पण याचा एकच अर्थ घ्यायला हवा तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील संयम-संस्कार व संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे,” अशी टीका शिवसेनेने केले आहे.

“पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेस हे शोभणारे तसेच परवडणारे नाही. प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी दिग्विजय मिळवलाच आहे व बंगाल काबीज करण्यासाठी जे गेले ते बंगालच्या खाडीत गटांगळय़ा खात आहेत. हे चित्र तुम्ही कसे बदलणार? ममता बॅनर्जी यांनी 216 जागा जिंकण्याचा चमत्कार केला याबद्दल त्यांचे अभिनंदन सगळेच करीत आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही ममतांचे जाहीर अभिनंदन केले. आता मोदी, शहा, राजनाथ सिंहांवरही चंद्रकांतदादा राग राग करणार की ममतांचे अभिनंदन केले म्हणून गुजरातमधल्या जुन्या प्रकरणांची थडगी उकरून काढण्याच्या धमक्या देणार? तिकडे भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनीही ममता यांना शुभेच्छा देण्यास तर नकार दिलाच, पण प. बंगालच्या जनतेने भ्रष्ट आणि क्रूर महिलेला पुन्हा सत्तेत आणून ऐतिहासिक चूक केली, असे तारेदेखील आपल्या फेसबुक पोस्टमध्ये तोडले. त्यावर चौफेर टीका होऊ लागताच त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. मात्र भाजपवाल्यांची डोकी ममतांच्या विजयामुळे कशी कामातून गेली आहेत याचाच हा पुरावा आहे,” अशा शब्दांत शिवसेनेने सुनावलं आहे.

“राजकारणात सगळेच दिवस सारखे नसतात. वर खाली होतच असते. महाराष्ट्रातील पंढरपूर पोटनिवडणूक भाजपा जिंकले, पण बंगालात आपटल्यामुळे पंढरपूरचा विजयही त्यांना गोड वाटत नाही. पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अटीतटीच्या लढतीत पडला. तेथे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले. हा लोकशाहीचा कौल सगळ्य़ांनीच मान्य केला. त्याबद्दल विरोधकांनीही भाजप आणि आवताडे यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. पंढरपुरात जिंकलेल्या आवताडे यांचे अभिनंदन करणाऱ्यांना बघून घेऊ, अशी भाषा कोणी केल्याचे दिसत नाही,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“मुळात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कौल पाहता बलदंड भाजपच्या हाती फार काही लागले आहे असे दिसत नाही. आसामातील भौगोलिक व सामाजिक परिस्थिती पाहता तेथे भाजपा विजयास पर्याय नव्हता. केरळ, बंगाल, तामीळनाडूत त्या पक्षाचा सुपडा साफच झाला. पुद्दुचेरीत मोडतोड तांबा पितळ झाले आहे. आता भाजपचा आनंद कशात तर नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी पराभूत झाल्या यात. नंदीग्रामच्या हिमतीचेही देशात कौतुक आहे. नंदीग्रामची जागा कठीण किंवा गैरसोयीची आहे म्हणून ममता दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघात उभ्या राहिल्या नाहीत. इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी, मायावती, मुलायम यादवांसारखे नेते एकाचवेळी दोन दोन मतदारसंघातून उभे राहिले. हे सुरक्षित राजकारण ममता बॅनर्जी यांनी केले नाही. त्यांनी आव्हान स्विकारले व त्याचाही बंगाली जनतेच्या मानसिकतेवर परिणाम झाला. ममतांचा हाच बेडरपणा बंगाली जनतेला आवडला,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

“भाजपाच्या पराभवाचे थडगे नंदीग्राममध्येच बांधले गेले. आज प. बंगालातून भाजपची पळताभुई थोडी झाली. प. बंगालवर विजय मिळवताच महाराष्ट्राकडे फौजा वळवू असे स्वप्न लोक पाहत होते. पंढरपूरच्या विजयाने त्यांच्या स्वप्नांना नवे पंख फुटलेच असते, पण महाराष्ट्र राज्याचे पुण्य कामी आले व बंगालात ममतांचा मोठा विजय झाला. त्याची आदळआपट दिल्लीपेक्षा महाराष्ट्रातच जास्त सुरू आहे. प्रकरण धमक्या आणि इशारे देण्यापर्यंत पोहोचले. महाराष्ट्रातील मंत्र्यांना-आमदारांना विरोधी पक्षाचे लोक अशाप्रकारे धमक्या देणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला पाहिजे,” असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

“महाराष्ट्राची राजकीय परंपरा व संस्कृतीचा अभ्यास कच्चा असल्याने हे घडत आहे. विरोधी मतांचा आदर करण्याची परंपरा या मातीची आहे. येथे तुकोबांची सत्य वाणी चालते. मंबाजीचे ढोंग चालत नाही. पंढरपुरात भाजपचा विजय झाला त्याबद्दल ‘विठोबा माऊली पावली’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली म्हणून कोणी विठोबा माऊलीवर राग धरेल काय? त्याच विठोबा माऊलीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले व महाविकास आघाडीचे सरकार आले. संपूर्ण बंगाल दोनेक महिने ‘जय श्रीराम’च्या गर्जनांनी घुमत होता, पण ‘जय श्रीराम’नेही भाजपच्या विजयासाठी त्यांचे कोदंड धनुष्य उचलले नाही. आता ममतांचा विजय झाला म्हणून महाराष्ट्रातील भाजपवाले श्रीरामास पुन्हा वनवासात पाठवण्याची धमकी देणार का?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena saamana editorial on maharashtra bjp leaders west bengal election result sgy
First published on: 04-05-2021 at 07:57 IST