वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही, अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने वीर सावरकरांवरुन राज्यात सुरु असलेल्या वादासंदर्भात म्हटलं आहे. उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटावरही शिवसेनेनं आगपाखड केली आहे. इतकेच नाही तर काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनाही ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये हा विषय उकरून काढण्याची काय गरज होती असा सवाल उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. इतिहासाशी वैर अलीकडे सगळ्यांनीच घेतलेले दिसते, असं म्हणत रागुल गांधींबद्दल सूचक विधान अग्रलेखात करण्यात आलं आहे.

पाहा >> पुणे: …अन् ती महिला सावरकरांच्या फोटोलाच जोडे मारायला निघाली; शिंदे गटाच्या आंदोलनातील Video चर्चेत

sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
What Satej Patil Said?
सतेज पाटील यांचा हल्लाबोल, “भाजपा देशपातळीवर २१४ जागांच्या वर जात नाही, कार्यकर्त्यांना गाजर..”
Satyaki Savarkar
Rahul Gandhi Case : “पोलीस तपासांत एवढा विलंब का?”, सात्यकी सावरकर यांचा थेट सवाल

नकली हिंदुत्ववाद्यांना सावरकर प्रेमाचे आचकेउचके लागले
“भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मिंधे गटाचे वीर सावरकर प्रेम अचानक उफाळून आले, पण त्यांना ही अशी उफाळण्याची संधी राहुल गांधी यांनी दिली. हा सर्व प्रकार टाळता आला असता तर बरे झाले असते. ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांचे भव्य स्वागत झाले. जनतेचा प्रतिसादही उदंड लाभला. हे सर्व उत्तम चालले असताना राहुल गांधी यांना सावरकरांच्या कथित माफीचा विषय काढून भाजपा व मिंधे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हती हे खरेच. त्यामुळे नकली हिंदुत्ववाद्यांना सावरकर प्रेमाचे आचकेउचके लागले,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

त्यांना राहुल व सावरकर यांच्यातला फरक कळला नाही
“राहुल गांधी व त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी मिंधे गटाचे लोक काही ठिकाणी रस्त्यावर उतरले. मात्र पुण्यात या लोकांनी राहुल गांधींना सोडून सावरकरांनाच जोडे मारल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला व त्याचा निषेध केला पाहिजे, पण निषेध करण्यासाठी ज्यांना रस्त्यावर उतरवले त्यांना राहुल व सावरकर यांच्यातला फरक कळला नाही, असा एकंदरीत हिंदुत्वाचा गोंधळ सरकारात उडालेला दिसतोय,” असा खोचक टोला शिंदे गटाच्या पुण्यातील आंदोलनामध्ये घडलेल्या प्रकारावरुन ठाकरे गटाने लगावला आहे.

नक्की वाचा >> “…तर भारत जोडो यात्रेचं ‘वेगळ्या’ पद्धतीने स्वागत करावं लागेल”; राहुल-आदित्य गळाभेटीचा उल्लेख करत BJP आमदाराचा इशारा

…पण अचानक वीर सावरकरांच्या नावाने त्यांचे मन अस्थिर होते व…
“वीर सावरकर हे अंदमानच्या काळ्या पाण्यातून इंग्रजांची माफी मागून सुटले की फ्रान्स येथे मारिया बोटीतून उडी मारून निसटले, हा काही राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा विषय नव्हता. देशातील नफरत, द्वेषाचे पसरत चाललेले जहर, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर लोकांना जागे करण्यासाठी राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. राहुल गांधी रोज साधारण १५ किलोमीटर चालतात व त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात जनता चालत असते. राहुल गांधी यांची जी प्रतिमा गेल्या काही वर्षांत भाजपाने तयार केली त्याला छेद देणारी त्यांची ही ‘भारत जोडो’ यात्रा आहे. भारतीय जनता पक्ष कितीही ‘नाही नाही’ म्हणत असला तरी ‘भारत जोडो’ यात्रेची दखल त्यांना घ्यावी लागत आहे. राहुल गांधी यांचे श्रम, कष्ट त्यामागे आहेत; पण अचानक वीर सावरकरांच्या नावाने त्यांचे मन अस्थिर होते व सर्व केलेल्यावर पाणी पडते. असे का व्हावे?” असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

या सगळ्याची गरज नव्हती, पण…
“महाराष्ट्रात येऊन सावरकरांच्या कथित माफी प्रकरणाचा कोळसा उगाळल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांची अवस्थाही अवघडल्यासारखी झाली असेल. राहुल गांधी यांनी हिंगोलीत विधान केले की, ‘‘सावरकर हे इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसविरोधात सावरकर इंग्रजांसोबत काम करायचे.’’ त्याशिवाय, ‘मला मुक्त करा, मी बाहेर येताच आपल्या आज्ञाधारक सेवकाप्रमाणे काम करीन,’ असेही सावरकर यांच्या याचिकेत म्हटल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले व त्याबाबतची कागदपत्रे पत्रकारांसमोर फडकवली. या सगळ्याची गरज नव्हती, पण हे राहुल गांधी यांना सांगायचे कोणी?” असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे.

तुरुंगात सडत मरण्यापेक्षा बाहेर पडून…
“सावरकर हे देशातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी होते. नाशिकच्या जॅक्सन वधाच्या खटल्यातील ते मुख्य आरोपीच होते. ब्रिटिश साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी सशस्त्र क्रांतिकारक तयार करण्याचे काम सावरकरांनी केले. ब्रिटिशांना सावरकरांचे भय वाटत होते म्हणूनच त्यांना तब्बल पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून अंदमानात धाडण्यात आले. इतकी भयंकर शिक्षा ठोठावलेले या भारतमातेचे ते एकमेव सुपुत्र होते. अंदमानात सावरकरांनी १० वर्षांची यातनामय शिक्षा भोगली. या काळात त्यांनी पाचेक वेळा ब्रिटिश सरकारकडे दया याचिका केली व त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. तुरुंगात सडत मरण्यापेक्षा बाहेर पडून थांबलेले क्रांतिकार्य पुढे न्यावे, असे त्यांना वाटत असावे,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

इतिहासाशी वैर अलीकडे सगळ्यांनीच घेतलेले दिसते
“इकडे बाहेरही स्वतः महात्मा गांधी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत होते. सावरकरांनी तेव्हाच्या ब्रिटिश सरकारकडे दया याचिका करायला हरकत नाही हे महात्मा गांधींचेही मत होते. निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला असतो. त्यानुसार सावरकरांनी सरकारकडे याचिका केली. सावरकरांच्या सहा दया याचिका सरकारने फेटाळून लावल्या हेसुद्धा तितकेच खरे. अटी व शर्तींवर पुढे सावरकरांची सुटका झाली तरी त्यांच्यावर ब्रिटिशांची करडी नजर होती. सावरकर सरकारकडून उपजीविकेसाठी पेन्शन घेत होते ते अत्यंत तुटपुंजे होते. यावर स्वतंत्रपणे बोलता येईल; पण ब्रिटिश साम्राज्याचा पाया जेवढा महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीने हलवला, तेवढाच तो सावरकरांसारख्या क्रांतिकारकांच्या लढ्यामुळेही उखडला. महात्मा गांधींनाही त्याची कल्पना होती. पन्नास वर्षांची शिक्षा ठोठावताच ‘‘तोपर्यंत तुमची सत्ता राहील काय?’’ असा भेदक प्रश्न विचारून साखळदंडात जखडलेले सावरकर अंदमानकडे निघालेल्या बोटीत चढले. काय हा आत्मविश्वास! हे सर्व इतिहासात नोंदवले आहे, पण इतिहासाशी वैर अलीकडे सगळ्यांनीच घेतलेले दिसते,” असा टोला ठाकरे गटाने राहुल यांना लगावला आहे.

हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व समजवणार
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचा स्वातंत्र्य लढ्यात काडीइतकाही संबंध नव्हता. तसा तो सावरकरांच्या विचारधारेशी नव्हता. सावरकरांच्या हिंदू महासभेवर तर या लोकांनी आगपाखडच केली. त्यामुळे सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत. मिंधे गटाचे लोक तर राहुल गांधी समजून वीर सावरकरांनाच रस्त्यावर जोडे मारीत आहेत. असे हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि सावरकरांचे विचार समजवायला निघाले आहेत,” अशी टीका लेखातून करण्यात आली आहे.

ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात?
“गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपाचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्यांची भूमिका वठवतात. यास ढोंग नाही म्हणायचे तर काय? वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपावाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात. पण ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात, हाच संशोधनाचा विषय आहे,” असंही लेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्र वीर सावरकरांचा सन्मान करत राहील
“राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा देशात पसरत चाललेल्या तिरस्कार व द्वेषाच्या राजकारणाविरोधात आहे, पण वीर सावरकरांसारख्या स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत राहुल गांधींच्या मनात ठासून भरलेला तिरस्कार आधी नष्ट व्हायला हवा. महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो, आदर करतो. त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो, करत राहील,” असं सूचक विधान लेखाच्या शेवटी करण्यात आलं आहे.