राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. यामुळे आधीच राजकीय वर्तुळातलं वातावरण तापलं असतानाच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने त्यात भर पडली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकून सरकारसाठी पुढे काय वाढून ठेवलंय याचा इशारा दिला. तर तिकडे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून “ठाकरे सरकारची फडणवीस-महाजनांच्या अटकेची चर्चा चालू होती” असं विधान करून खळबळ उडवून दिली. तसेच, “देशद्रोह्यांसह चहापान टळले ते बरेच झाले”, असं विधान करून विरोधकांवर तोंडसुखही घेतलं. त्यावर आता ठाकरे गटाकडून टीकास्र सोडण्यात आलं आहे. सामना अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे.

‘…असे मोदीछाप विधान मुख्यमंत्र्यांनी केले!’

विरोधकांना देशद्रोही म्हटल्यावरून ठाकरे गटानं मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतलं आहे. “विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस बोलताना मुख्यमंत्री विरोधी पक्षांबद्दल म्हणाले की, “ते आले नाहीत ते बरेच झाले. त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले, ज्यांनी देशद्रोह केला त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही. त्यांच्याबरोबर चहा पिणे टळले हे बरेच झाले.” महाराष्ट्रातील राजकीय विरोधक देशद्रोही आहेत, असे ‘मोदी’छाप विधानदेखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले. विरोधकांना देशद्रोही ठरवणे ही भाजपची परंपरा आहे’, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

‘…मग यांना महाराष्ट्रद्रोही नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?’

‘मिंधे गटाच्या आमदारांनी व आमदारांच्या मुख्य नेत्याने भाजपचा ‘बाप्तिस्मा’ घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मुळात महाराष्ट्रातील सरकार घटनाबाह्य पद्धतीने बनविण्यात आले. सरकारमधील चाळीस आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे. तेव्हा महाराष्ट्रावर लादलेल्या अशा बेकायदा सरकारच्या चहापानास जाणे हाच महाराष्ट्रद्रोह म्हणायला हवा. महाराष्ट्राला कमजोर व लाचार करण्याचे प्रयत्न दिल्लीतून सुरू आहेत. मुंबई-महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातेत पळवले गेले व मुख्यमंत्री त्यावर गप्पच बसले. ही महाराष्ट्राशी बेइमानीच ठरते. मग असल्या बेइमान सरकारला महाराष्ट्रद्रोही म्हणायचे नाही तर काय म्हणायचे?’ असा सवालही अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

“आता सगळ्यांना पटायला लागलंय की, २०२४ ची निवडणूक कदाचित…”, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

‘मुख्यमंत्री फक्त खुर्चीवर, कारभार तर…’

‘मुख्यमंत्री शिंदे यांचा सपशेल गौतमभाई अदानीच झाला आहे. अदानी कंपन्यांचे शेअर्स दणादण कोसळत आहेत. त्यांची फुगवलेली श्रीमंती जागतिक यादीतून हद्दपार झाली. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देशातील पहिल्या दहाच्या यादीतही नाहीत. कारण मुख्यमंत्री फक्त खुर्चीवर आहेत व कारभारी दिल्लीतून सूत्रे हलवीत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान आहे’, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘..मग फडणवीस-महाजनांना कोण हात लावणार?’

‘देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना जेलमध्ये पाठविण्याची योजना होती, असा भिजका लवंगी ‘स्फोट’ मुख्यमंत्र्यांनी करून लाचारीचे टोकच गाठले. अटकेच्या सुपाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा घेत आहेत व देशभरातील विरोधकांना अटक केली जात आहे. त्या यंत्रणांचे मालक दिल्लीत बसले असताना फडणवीस-महाजनांना कोण हात लावणार? विद्यमान मुख्यमंत्र्यांचा कायद्याचा अभ्यास कच्चा आहे व ज्यांच्या सावलीत ते वावरत आहेत त्या फडणवीस यांच्याकडे वकिलीची डिग्री असली तरी महाराष्ट्रद्रोह्यांची वकिली करण्यातच ते धन्यता मानीत आहेत’, अशा शब्दांत शिंदे सरकारवर ठाकरे गटानं टीकास्र सोडलं आहे.