Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut, 26 July 2022: पक्षात झालेलं बंड आणि राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. या मुलाखतीनंतर पुन्हा एकदा शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Live Updates

Uddhav Thackeray Mulakhat: सध्याची स्थिती आणि समोर उभ्या असलेल्या आव्हानांवर उद्धव ठाकरेंची रोखठोक मुलाखत

09:59 (IST) 26 Jul 2022
तुम्ही रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला का? उद्धव ठाकरे म्हणाले…

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर या बंडखोरीमागे नेमकी काय कारणं? कोण जबाबदार? यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. या बंडानंतर पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दिलीय. यात त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीमागील कारणं आणि शिवसेनेचा पुढील राजकीय प्रवास यावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी ते रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केलाय. ही मुलाखत ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली.

सविस्तर बातमी…

09:57 (IST) 26 Jul 2022
शिवसेनेत विश्वासघाताचं राजकारण वारंवार का होतं? बाळासाहेब-माँचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी सांगितली कारणं

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर याआधीही शिवसेनेतील बंडाबाबतही चर्चा होतेय. तसेच शिवसेनेच्या स्थापनेनंतर अनेकदा शिवसेनेत बंडखोरी का होते असाही प्रश्न विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सविस्तर बातमी…

09:53 (IST) 26 Jul 2022
शिवसेनेवरील सूड घेण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या अस्तित्वाला सुरुंग? उद्धव ठाकरे म्हणाले

Uddhav Thackeray Interview Today: काँग्रेससोबत गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं असं तुम्ही म्हणात असाल तर, मग मुफ्ती मोहम्मद आणि मेहबुबा मुफ्तीसोबत गेलात तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? अशी विचारणा शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला केली आहे. दिल्लीत खुर्चीला असा कोणता स्प्रे मारला आहे ज्यामुळे, ज्यांनी जपलं त्यांनाच संपवायला निघाला आहात असंही त्यांनी विचारलं आहे. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

सविस्तर बातमी

09:50 (IST) 26 Jul 2022
खरी शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? या प्रश्नावर उद्धव म्हणाले, “आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही, निवडणुका येऊ दे…”

शिवसेनेत वर्चस्व कोणाचे आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, या दोन मुद्दय़ांवरील निवडणूक आयोगापुढील सुनावणीला शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.  निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज शिवसेना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आहे. असं असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विषयावरुन आम्हाला शिवसेनेसंदर्भात पुरावे देण्याची गरज नसून मतदारच बंडखोरांना निवडणुकीच्या रिंगात पुरुन टाकतील असा टोला लगावलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त…

09:50 (IST) 26 Jul 2022
Uddhav Thackeray Interview: “सध्या फास्ट फूडचा जमाना आहे”

“सध्या फास्ट फूडचा जमाना आहे, तसंच पक्षात गेल्यावर काही दिवसात काहीतरी मिळालंच पाहिजे अशी अपेक्षा असते, नाही मिळालं तर दुसरं आहे,” असा टोला त्यांनी लगावला. जनता सार्वभौम आहे आणि एखादा निर्णय जनतेच्या मनाविरोधात गेला तर थांबत नाही, तर ती रस्त्यावर उतरते असा इशाराही त्यांनी दिला.

09:50 (IST) 26 Jul 2022
Uddhav Thackeray on Nitish Kumar: “नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का?”

“नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? त्यांनी एकदा संघमुक्त भारत असा नारा दिला होता. राममंदिराच्या मुद्द्यावर रामविलास पासवान एनडीएतून बाहेर पडल्यानंतरही त्यांना प्रिय होते. आम्ही तर उलट विशेष कायदा तयार करा सांगत होतो. पाच, सात वर्ष झाले तरी ते राममंदिर उभारु शकले नव्हते, न्यायालयाने तो निकाल दिला,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

देशातील विरोधीपक्ष, प्रादेशिक पक्ष आणि मित्रपक्ष संपवण्याचं काही कारस्थान दिसत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं “हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. मध्यंतरी सरन्यायाधीशांनी देशात विरोधी पक्षाला शत्रू समजू नका असं सांगितलं. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने जबाबदारीने वागलं पाहिजे. मी अडीच वर्षात मुख्यमंत्री असता विरोधी पक्षांना सरकार म्हणून आमचं काही चुकत असेल तर नजरेत आणून द्या असं आवाहन केलं होतं. ते विरोधी पक्षाचं काम आहे, तेदेखील लोकप्रतिनिधी असतात. सशक्त लोकशाहीसाठी विरोधी पक्षही तितकाच सुसंस्कृत, संवदेशनशील पाहिजे. त्याहून थोडा जास्त सत्ताधारी पक्ष सुसंस्कृत, संवदेशनशील हवा. आता ही संवदेनशीलता, सुसंस्कृतपणा रसातळाला जात आहे. पिढ्या बदलत असून सत्तेची हाव असल्याने हे होत आहे”.

09:49 (IST) 26 Jul 2022
Uddhav Thackeray on Rebel MLA: “तेव्हा तुम्ही लाज सोडली होती ना”

शिवसेनेवरील सूड घेण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या अस्तित्वाला सुरुंग लावला जात आहे का? असं संजय राऊत यांनी विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले “याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. जोपर्यंत हे दिल्लीत गेले नव्हते, तोपर्यंत बाळासाहेब ठाकरेच यांना जपत आणि वाचवत आले होते. एका हिंदुत्वाच्या ध्यासापायी, वेडापायी बाळासाहेबांनी त्यांना वाचवलं होतं. मग दिल्लीत खुर्चीला असा काय स्प्रे मारला आहे की, ज्यांनी जपलं त्यांनाच संपवायला निघाला आहात”.

“ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने बाबरीची जबाबदारी घेतली होती, त्याच शिवसेनेला हिंदुत्व सोडलं म्हणत तुम्ही संपवायला निघाला आहात. काँग्रेससोबत गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं असं तुम्ही म्हणत आहात, मग मुफ्ती मोहम्मद आणि मेहबुबा मुफ्तीसोबत गेलात तेव्हा काय सोडलं होतं? तेव्हा तुम्ही लाज सोडली होती ना,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

“मेहबुबा मुफ्ती आजही वंदे मातरम, भारतमाता की जय म्हणतात का? तिकडे निवडणुका घेऊन दाखवा असं आव्हान अतिरेक्यांनी दिलं होतं, म्हणून आम्ही निवडणुका घेऊन दाखवल्या असं त्यांनी सांगितलं होतं. पण सरकार झाल्यानंतर मुफ्ती मोहम्मद सईदने काश्मीर खोऱ्यात शांततेत निवडणूक झाल्याबद्दल पाकिस्तानचे आभार मानल होते,” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली.

09:47 (IST) 26 Jul 2022
Uddhav Thackeray on Shahajibapu Patil: “ग्रामीण भागात राहूनही तुम्हाला महाराष्ट्राचं सौंदर्य कधी दिसलं नाही”

“महाराष्ट्र फार सुंदर आहे. ग्रामीण भागातील आमदारांना या निसर्गाची भुरळ पडत नाही, पण गुवाहाटीमधील निसर्गाची भुरळ पडते. महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्याची तुम्हाला ओढ, प्रेम नाही. त्याचं वैभव कधी दिसलं नाही,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

सविस्तर बातमी

09:47 (IST) 26 Jul 2022
“बंडखोरांनी त्यांच्या आई-वडिलांना घेऊन…”; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटातील बंडखोरांना थेट आव्हान

शिवसेनेतील बंडखोर गट मुद्दाम बाळासाहेब ठाकरेंच्या नावाबद्दल संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. बंडखोरांचं खरोखर काही कर्तृत्व असेल तर त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचे फोटो लावून, त्यांना सभांमध्ये घेऊन जाऊन, भाषण ठोकून निवडणूक जिंकून दाखवावी असं आव्हान उद्धव यांनी बंडखोर गटातील शिवसेना नेत्यांना केलं आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त

09:47 (IST) 26 Jul 2022
Uddhav Thackeray Interview: …म्हणून घराबाहेर पडत नव्हतो

“घराबाहेर पडायचं नाही हेच मी लोकांना सांगत असल्याने मीदेखील घराबाहेर पडत नव्हतो. घराबाहेर न पडतासुद्धा देशातल्या सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव का आलं? कारण मी लोकांना घराबाहेर पडू नका सांगत होतो आणि लोक ऐकत होते. मी जर तेव्हाही आणि आजही घराबाहेर पडलो तरी शिवसेनाप्रमुखांच्या, पूर्वजांच्या आशीर्वादाने गर्दी होतेच. मग काय लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण असं झालं असतं,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी घराबाहेर न पडल्याच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

09:46 (IST) 26 Jul 2022
Uddhav Thackeray Interview: महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का?

महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? असा प्रश्न विचारला असता म्हणाले की “महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला असता तर जनतेने उठाव केला असता, पण तसं झालं नाही. कारण जनता आनंदी होती. सत्तेवर येताच आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. त्यानंतर करोना काळात संपूर्ण मंत्रिमंडळाने, प्रशासनाने आणि जनतेने उत्तम कार्य केलं. म्हणूनच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं असलं तरी ते मी माझं नाव मानत नाही. जनतेचा प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होतं. जर यांनी सहकार्य केलं नसतं तर मी एकटा काय करणार होतो”.

09:46 (IST) 26 Jul 2022
Uddhav Thackeray Interview: “ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे आणि याला हावरटपणा म्हणतात”

मुख्यमंत्री होणं चुकलं का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं “त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर काय झालं असतं? कारण यांची भूकच भागतच नाही. यांना मुख्यमंत्रीपदही पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे. शिवसेना प्रमुखांसोबत स्वत:ची तुलनाच करु लागला आहात. ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे आणि याला हावरटपणा म्हणतात, त्याला सीमा नसते”.

09:46 (IST) 26 Jul 2022
Uddhav Thackeray Interview: “जी विकली जाऊ शकते ती निष्ठाच नसते”

“त्यांना ताकद दिली ही माझी चूक आहे. त्यात ताकदीने त्यांनी उलटा वार केला. राजकारणात जन्म दिलेल्या आईला गिळायला निघालेली ही औलाद आहे. पण तेवढी ताकद त्यांच्यात नाही, कारण आई ही आईच असते,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. निष्ठा विकली जाऊ शकत नाही, जी विकली जाऊ शकते ती निष्ठाच नसते असंही त्यांनी सुनावलं.

09:45 (IST) 26 Jul 2022
Uddhav Thackeray Eknath Shinde: “चूक माझी आहे”

नेमकं काय चुकलं? असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरेंनी आपलीच चूक असल्याचं सांगितलं. “चूक माझी आहे आणि पहिल्याच फेसबुक लाईव्हमध्ये मी हे कबूल केलं होतं. माझा गुन्हा आहे की, मी यांना कुटुंबातील समजून अंधविश्वास ठेवला,” अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

09:44 (IST) 26 Jul 2022
Uddhav Thackeray Interview: “मी मलई बिलई खाण्यासाठी गेलो नव्हतो”

“ज्यांना मी अधिकार दिले होते त्यांनीच माझा विश्वासघात केला. त्यावेळी लोक माझ्या तोंडावर बोलत नव्हते, पण मला कुजबूज ऐकू यायची की, काय हे मुख्यमंत्री आहेत, नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे. मलईदार खातं आहे म्हणतात. पण मी ते खातं माझ्याकडे न ठेवता विश्वासाने त्यांच्याकडे सोपवलं होतं. मी मलई बिलई खाण्यासाठी गेलो नव्हतो. मी माझ्याकडे जी खाती ठेवली होती ती एक म्हणजे सामान्य प्रशासन, दुसरे न्याय व विधी. होय, आयटीही ठेवलं, कारण खरंच या तंत्रज्ञानाचा उपयोग सगळ्या खात्यांसाठी काहीतरी करता येईल का? हा माझा विचार होता,” असं त्यांनी सांगितलं.

09:43 (IST) 26 Jul 2022
Uddhav Thckaeray on Shivsena: “ठाकरेंना शिवसेना खरी की खोटी याचे पुरावे द्यावे लागतायेत हे दुर्दैव”

“माझा अजूनही देशाच्या घटनेवर भरवसा आहे, कायद्यावर भरवसा आहे. चोरी-मारी सगळीकडेच चालते असं माझं अजिबात मत नाही. मी जे म्हटलं ना की ‘सत्यमेव जयते, नाहीतर हे वाक्य तुम्हाला पुसावं लागेल आणि मग एकाची दोन वाक्यं करावी लागतील. एकतर ‘असत्यमेव जयते’ आणि दुसरं वाक्य ‘सत्तामेव जयते.’ त्यामुळे सत्तामेव जयतेपुढे तुम्ही असत्य घेऊन जर काही करणार असाल तर ते लोक खपवून घेणार नाहीत. ठाकरेंना शिवसेना खरी की खोटी याचे पुरावे द्यावे लागतायेत अशी वेळ आज आणली आहे आणि हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

09:42 (IST) 26 Jul 2022
“शिवसैनिकांमध्येच लढाई लावून शिवसेना संपवायचा डाव आहे”; फडणवीसांसंदर्भातील त्या घटनेचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा आरोप

ठाणेकर हे सुज्ञ असून शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता मिळाली त्या ठाण्यातच काय तर महाराष्ट्रभरातील लोक निवडणुकीचा वाटत पाहत असून निवडणुकीच्या निकालानंतर बंडखोरांचा हा पालापाचोळा उडून जाईल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. इतकचं नाही तर त्यांनी राजकीय पक्षांनी युती करताना करार करुन तो जनतेसमोर ठेवायला हवा असा कायदा बनवण्याची मागणीही केली. येथे वाचा सविस्तर वृत्त…

09:40 (IST) 26 Jul 2022
“ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा”

“माझं त्यांना आव्हान आहे, ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा. मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडिलांबद्दल आदर आहे. तसा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आई-वडिलांबद्दल आदर असला पाहिजे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

09:37 (IST) 26 Jul 2022
भाजपाला शिवसेना का संपवायची आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आता त्यांना…”

राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामध्ये भाजपाचं पाठबळ असलेला शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा संघर्ष पहायला मिळत आहे. मागील महिन्याभरापासून अनेक आरोपप्रत्यारोप करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमधून बंडखोरीसंदर्भात भाष्य केलं आहे. अनेक विषयांना हात घालताना भाजपाला शिवसेना नेमकी काय फोडायची आहे या प्रश्नालाही ठाकरेंनी उत्तर दिलंय. येथे वाचा सविस्तर वृत्त…

09:30 (IST) 26 Jul 2022
“जसं गांधी आणि काँग्रेस वेगळी करायची होती, तसंच…”

“त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत. जसं गांधी आणि काँग्रेस वेगळी करायची होती. होय खरंच आहे. मला केवळ टीकात्मक बोलायचं म्हणून मी बोलत नाही. पण आता सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषबाबू तसं बाळासाहेब. हे स्वतःचेच म्हणून आता लोकांसमोर आणायचा प्रयत्न करताहेत. म्हणजे आपल्याकडून काही आदर्श निर्माण झाला नाही तसं दुसऱयांचा जसा पक्ष फोडताहेत तसे आदर्श फोडायचे. आदर्श पळवायचे आमदारांप्रमाणे, फोडायचे म्हणा किंवा पळवायचे म्हणा, आणि ते आपलेच म्हणून लोकांसमोर जायचं. तसं त्यांचं चाललंय की बाळासाहेबांना त्यांनी मान-सन्मान तर दिलाच पाहिजे नाहीतर लोकं जोडय़ाने मारतील. लोक त्यांना जागेवर ठेवणार नाहीत. कोणी असला आणि तो बाळासाहेबांच्या विरोधात काही बोलला तर लोक हाणतीलच जोडा त्याच्या; म्हणून त्यांना बाळासाहेब पाहिजेत. पण आता ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचंय,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

09:30 (IST) 26 Jul 2022
“शिवसैनिकांमध्येच लढाई लावायची, शिवसेना खतम करायची असा डाव”

“आमच्या महाविकास आघाडीमध्ये सभ्यता होती, समन्वय होता. असो. त्याच्यावर बोलायचं असेल तेव्हा मी बोलेन. त्यांचे उपमुख्यमंत्री बोलले की त्यांच्यासोबत जे लोक आहेत ते म्हणजेच शिवसेना. म्हणजेच त्यांचा डाव असा आहे की, शिवसैनिकांमध्येच लढाई लावायची, शिवसेना खतम करायची आणि एकदा का काम संपलं की पालापाचोळा टोपलीत भरला की नेऊन टाकायचा,” असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

09:29 (IST) 26 Jul 2022
“अजित पवारांनी कधी माईक खेचला नाही”

“मधल्या काळात एक क्लिप फिरली बघा.. खरं तर असं माझ्या काळात कधी झालं नव्हतं. माझ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसायचे, पण त्यांनी कधी माझा माईक खेचला नव्हता. काही वेळेला त्यांच्याकडे अर्थसंकल्प वगैरे संदर्भात अधिक माहिती असायची तेव्हा मी त्यांना सांगायचो की, दादा तुम्ही उत्तर द्या. माझ्याकडून कोणी माईक नाही खेचला,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

09:29 (IST) 26 Jul 2022
“म्हणूनच ते भ्रम निर्माण करताहेत की, आम्ही म्हणजेच शिवसेना”

“पण या सगळ्या कालखंडामध्ये कधी नव्हे तो एक अघोरी प्रकार होतो आहे. जो महाराष्ट्रात कधीच झाला नव्हता. तो म्हणजे कोणीतरी संपूर्ण शिवसेना ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न करतंय. कारण त्यांना पर्याय नाहीये. कारण नीट लक्षात घ्या, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जे काही थोडंफार कायद्याचं ज्ञान मी लोकांशी बोलून, कायदे तज्ञांशी बोलून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यातून सांगतो की, पूर्वी दोनतृतीयांश ही सदस्य संख्या झाली की वेगळा गट स्थापन करता येऊ शकत होता. आता तो कायदा गेला. आता हे जे बाजूला झाले ते भलेही दोनतृतीयांश असतील किंवा आणखी काहीतरी असतील त्यांना वेगळा गट स्थापन करता येत नाही हे कायदेतज्ञांनी सांगितले आहे. मी कायदा लिहिलेला नाही, मी कायदा वाचलेला नाही. घटनातज्ञांनी ज्यांनी त्याचा अभ्यास केला आहे त्यांनी सांगितलेली मते ऐकून आणि त्यांच्याशी बोलून सांगतो आहे. म्हणजेच काय की, या गटाला कुठल्या ना कुठल्या तरी पक्षामध्ये विसर्जित किंवा सामील व्हावं लागेल. मग त्यांच्यासमोर पर्याय काय आहे? एकतर भाजपात जावं लागेल, नाहीतर दुसरे सपा, एमआयएम वगैरेसारखे जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्याकडे जावं लागेल. आणि हे जर कोणत्या पक्षात गेले तर भारतीय जनता पक्षाचा यांना जो उपयोग करून घ्यायचा आहे तो उपयोग संपेल. कारण त्यांची ओळख त्यांना तीच द्यावी लागेल की आता आम्ही भाजपात गेलो, आता आम्ही समाजवादी पार्टीत गेलो, आता आम्ही बच्चू कडूंच्या पक्षात गेलो. म्हणूनच ते भ्रम निर्माण करताहेत की, आम्ही म्हणजेच शिवसेना,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

09:28 (IST) 26 Jul 2022
“होऊ दे जनतेच्या कोर्टात फैसला; माझी तयारी आहे”

“जे माझं आणि भारतीय जनता पक्षाचं मुख्यमंत्रीपदाबद्दल ठरलं होतं. आधी नाकारून त्यांनी आता ते केलं. ते आधी जनतेसमोर उघडपणे आलं असतं. दुसरी गोष्ट, निवडणुकीनंतर त्यामुळे मला जे काही करावं लागलं ते करावं लागलं नसतं. त्यामुळे महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. त्या महाविकास आघाडीला आम्ही जन्म दिला तेव्हाही तुम्ही पाहिलं असेल की, मी जी शपथ घेतली ती शिवतीर्थावर घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बाळासाहेबांचं स्मारक आहे तिथे. त्यांच्या साक्षीने ती घेतली. हजारो, लाखो लोक त्यावेळी उपस्थित होते. शिवतीर्थ संपूर्ण भगवेमय झाले होते, ओसंडून वाहत होते. लोक नाराज असते तर तिथे कोणीही आलं नसतं. पण तरीदेखील माझं मत असं आहे की, आता निवडणुका घ्या. जर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करून चूक केली असेल तर लोक आम्हाला घरी बसवतील. शेवटी जनता मला ओळखतेच. नाही म्हटले तरी आता आमची सहावी पिढी ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करतेय. त्याच्या आधीच्या पिढय़ासुद्धा होत्याच. भारतीय जनता पक्षाने आमच्याशी जो करार केला होता तो तोडला. म्हणून त्यांच्या चुकीसाठी लोपं त्यांना घरी बसवतील, नाहीतर आम्ही पाप केलं म्हणून आम्हाला घरी बसवतील. होऊ दे जनतेच्या कोर्टात फैसला; माझी तयारी आहे,” असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

09:28 (IST) 26 Jul 2022
“हा जो पालापाचोळा आहे तो म्हणजे ठाणेकर नाहीत”

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचं एक भावनिक नातं होतं. पहिला भगवा झेंडा ठाण्यात फडकला. बाळासाहेब त्यांच्या जीवनाच्या संपूर्ण कालखंडात अभिमानाने हे सांगत राहिले की, ठाण्यानं मला पहिली सत्ता दिली. त्याच ठाण्यातून शिवसेनेला आव्हान उभं राहिलं. ठाणेकर सुज्ञ आहेत. हा जो पालापाचोळा आहे तो म्हणजे ठाणेकर नाहीत. ठाणेकर म्हणजे ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे जे नातं आहे ते या पालापाचोळ्यांना तोडता येणार नाही. त्याच्यामुळे मी तर म्हणेन पूर्ण महाराष्ट्र म्हणजेच त्यात ठाणे आणि मुंबईसुद्धा आले, ते निवडणुकांची वाट पाहात आहेत. म्हणून माझं मत हेच आहे की, याच्यापुढे असा एक कायदा झाला पाहिजे की, ज्या कोणाला युत्या करायच्या असतील त्या दोन्ही पक्षांचं, तीन पक्षांचं, दहा पक्षांचं जे काही कडबोळं तुम्हाला करायचं असेल ते करा. मात्र तुमच्यामध्ये काय करार-मदार झाला आहे तो जनतेसमोर ठेवा. जागावाटप किती होणार आहे? कोणत्या ध्येयावरती, धोरणावरती तुम्ही युती करणार आहात? काय पुढे करणार आहात ते करा,” अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

09:28 (IST) 26 Jul 2022
“शिवसेना आणि संघर्ष हे तर एकमेकांच्या पाचवीला पुजले आहेत”

“शेवटी शिवसेना आणि संघर्ष हे तर एकमेकांच्या पाचवीला पुजले आहेत. आणि मागेही कोणीतरी असं म्हणालं होतं आणि त्याचा मला वारंवार अनुभव येतो की, शिवसेना ही एक तळपती तलवार आहे. ती जर म्यानात ठेवली तर ती गंजते. त्याच्यामुळे ती तळपलीच पाहिजे. आणि तलवार तळपणं म्हणजे संघर्ष आलाच. अर्थात याचा असा अर्थ कोणी घेऊ नये की तलवारीने वार करा वगैरे, असं माझं म्हणणंही नाही. ही एक उपमा आहे. पण संघर्षासाठीच तर शिवसेना जन्माला आली. त्यावेळी मराठी माणसासाठी, भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेचा जन्म झाला. त्याच्यानंतर हिंदुत्वासाठी शिवसेना लढली. मग ते 92-93 साल असेल किंवा त्यानंतर कधीही असेल. शिवसेना आणि संघर्ष; जिथे अन्याय तिथे वार. हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे,” याची आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली.

09:27 (IST) 26 Jul 2022
“आपण हिंदुत्वापासून दूर गेलो असा कोणताही निर्णय केला नाही”

“मला एक प्रसंग असा दाखवा किंवा माझ्या हातून घडलेली एखादी गोष्ट अथवा मुख्यमंत्रीपदावर असतानाचा एखादा निर्णय सांगा की, ज्याच्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलं. एक निर्णय दाखवा. अयोध्येला तर तुम्ही आतासुद्धा गेला होतात. अयोध्येमध्ये आपण महाराष्ट्र भवन उभं करतो आहोत. बरोबर आहे? हे हिंदुत्वाला सोडून आहे का? तुम्हीच ठरवा. मुख्यमंत्री होण्याआधी मी अयोध्येत गेलो होतो. प्रत्येक वेळी आपण होतात. मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा अयोध्येत गेलो होतो. कोण काय म्हणेल याची मी पर्वा केली नाही. मी गेलो आणि रामलल्लाचं दर्शन घेऊन तेव्हाही आलो होतो. दोनदा मी स्वतः अयोध्येत गेलो होतो. आता नवी मुंबईत आपण तिरुपती मंदिरासाठी जागा दिली. जी प्राचीन मंदिरं आहेत त्यांचं संवर्धन करणं, जतन करणं हे आपण सुरू केलं. गडकिल्ल्यांचं संवर्धन आपण सुरू केलं. यात हिंदुत्व गेलं कुठे? आपण हिंदुत्वापासून दूर गेलो असा कोणताही निर्णय केला नाही. अशा अनेक गोष्टी सांगता येतील,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

09:19 (IST) 26 Jul 2022
“राजकारण मजबूत करण्यासाठी त्यांनी हिंदुत्व वापरलं”

“प्रत्येक वेळी शिवसेना अधिक जोमाने आणि तेजाने उभी राहिली. आतासुद्धा त्यांना हिंदुत्वाशी फारकत नको असेल तर माझं हे नेहमीच म्हणणं आहे की, शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वासाठी राजकारण केलं ते हिंदुत्व मजबूत व्हायला हवं म्हणून! पण हे राजकारणासाठी हिंदुत्व वापरतायत. हा आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातला फरक आहे. ते विचारतायत ना तुमच्या आणि भाजपाच्या हिंदुत्वातला फरक काय, तर तो हा फरक आहे. शिवसेनेचं राजकारण हे आम्ही हिंदुत्व मजबूत होण्यासाठी केलं. पण त्यांचं राजकारण मजबूत करण्यासाठी त्यांनी हिंदुत्व वापरलं,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

09:18 (IST) 26 Jul 2022
“…त्यांना शिवसेना संपवायची आहे”

“त्यांना शिवसेना संपवायची आहे. जे शिवसेनेसोबत ठरवलं होतं अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद; तेच तर तुम्ही आता केलंत आणि ते जर तेव्हा केलं असतं तर निदान पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाला एकदा तरी अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळालं असतं; ही जी काही आता सोंगं ढोगं करतायत की आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं ती करावी लागली नसती आणि आता ते म्हणताहेत की ‘आमची’ शिवसेना ही शिवसेना नाहीये; हे सगळं तोडपाणी करून त्यांचं समाधान होत नाही, कारण त्यांना शिवसेना संपवायची आहे,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

09:17 (IST) 26 Jul 2022
“विमानांचा खर्च, हॉटेलचा खर्च यावर हजारो कोटींची उधळण”

“तुम्हाला मधला एक कालखंड आठवत असेल, जेव्हा शिवसेना विरोधी पक्षात बसली होती तेव्हा अनेकांना असं वाटलं होतं की, शिवसेना आता संपेल. पण त्या वेळी शिवसेना एकाकी लढली आणि 63 आमदार निवडून आले. त्या काळात विरोधी पक्षाचीही जबाबदारी आपल्यावर आली होती, तेव्हा मी पद कुणाला दिलं होतं? भाजपाने आता जे केलंय हे माझ्याशी बोलणी केल्याप्रमाणे तेव्हा केलं असतं तर सगळं काही सन्मानाने झालं असतं. देशभरात ‘पर्यटन’ करण्याची गरज भासली नसती; आणि असं मी ऐकलंय, असं मी वाचलंय, माझ्याकडे पक्की माहिती नाही, पण हजारो कोटी रुपये यावर खर्च केले गेले. विमानांचा खर्च, हॉटेलचा खर्च, त्यानंतर काही आणखी अतिरिक्त खर्च,” असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

09:16 (IST) 26 Jul 2022
“आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही”

“हा पक्ष आम्ही ‘प्रोफेशनली’ चालवत नाही असेच मी म्हणेन. आपण पक्षाकडे एक परिवार म्हणून बघत आलोय. बाळासाहेबांनी आपल्याला तेच शिकवलंय. माँनी तेच शिकवलंय की, आपलं म्हटल्यानंतर आपलं. कदाचित राजकारणामधला गुन्हा किंवा चूक असेल ती आमच्याकडून वारंवार होते. ती म्हणजे एखाद्यावर विश्वास टाकला की आम्ही त्याच्यावर अंधविश्वास टाकतो. पूर्ण जबाबदारीने त्याला ताकद देणं असेल, शक्ती देणं असेल; आम्ही ते करतो, पण आता ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, २०१४ साली भाजपाने युती तोडली होती तेव्हा आपण काय सोडलं होतं?; काहीच सोडलं नव्हतं. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

09:10 (IST) 26 Jul 2022
‘सत्ता होती तेव्हाची’ आणि ‘सत्ता गेल्यानंतर’च्या मुलाखतीमधील फरक दाखवत निलेश राणेंनी सेनेला केलं लक्ष्य; कॅप्शन चर्चेचा विषय

पक्षात झालेलं बंड आणि राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. या मुलाखतीचा टीझर काल राऊत यांनी शेअर केल्यानंतर या टीझरवरुनच निलेश राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. निलेश राणेंनी यापूर्वीच्या मुलाखतींमध्ये आणि सध्याच्या मुलाखतीमधील फरक दाखवणारा एक फोटो पोस्ट करत शिवसेनेवर टीका केलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त…

09:05 (IST) 26 Jul 2022
“हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती, तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या ”

“मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या आणि त्याही पक्षाच्या विरोधात,” अशी खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.

09:03 (IST) 26 Jul 2022
“ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत”

“मानेची शस्त्रक्रिया ही काय असते ते कोणत्याही डॉक्टरला विचारा. त्यात काय धोके असतात याची कल्पना मला होती. पण ती शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. माझी पहिली शस्त्रक्रिया झाली. या पहिल्या शस्त्रक्रियेतून मी चांगला होऊन बाहेर पडलो होतो. त्यानंतर पाच-सात दिवसांनी डॉक्टर मला म्हणाले, उद्धवजी, उद्या आपल्याला जिना चढायचा आहे. त्यामुळे मी त्या मानसिक तयारीत होतो की उद्या आपल्याला जिना चढायचाय. एक एक पाऊल पुढे जायचं; सकाळी जाग आल्यानंतर जरा आळस देण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात मानेत एक ‘क्रॅम्प’ आला आणि माझी मानेखालची सगळी हालचालच बंद झाली. श्वास घेताना मी पाहिलं तर माझं पोटही हलत नव्हतं. पूर्णपणे मी निश्चल झालो होतो. एक ‘ब्लड क्लॉट’ आला होता. सुदैवाने डॉक्टर वगैरे सगळे जागेवरच होते. ज्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात, त्या ‘गोल्डन अवर’मध्ये ऑपरेशन झालं म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे बसलो आहे. त्यावेळी माझे हातपाय हलत नव्हते, बोटं हलत नव्हती, सगळ्यात मोठं टेन्शन होतं की डास चावला, मुंगी चावली तर खाजवायचं कसं? हाही एक वेगळा विचित्र भाग होता. त्या काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार?; तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

08:59 (IST) 26 Jul 2022
“कोणत्या परिस्थितीत महाविकास आघाडीला आपल्याला जन्म द्यावा लागला ”

“मुळातच माझी ‘वर्षा’वर जाण्याची इच्छा होती का? याचं उत्तर सर्वांना माहीत आहे. याचा अर्थ आता मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून वाईट बोलतोय असं मुळीच नाही. ते एक वैभव आहे. मुख्यमंत्रीपदाचा आणि ‘वर्षा’चा मी अजिबात अनादर करणार नाही. ती एक वेगळी वैभवशाली वास्तू आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे एक वैभवशाली पद आहे, जबाबदारीचं पद आहे. त्याचा पूर्ण आदर ठेवून सांगतो, मी कधीच वैयक्तिक अशी स्वप्ने बघितली नव्हती. त्यावेळी जे घडलं ते आजच्या लोकांना ज्यांना आपण विश्वासघातकी म्हणू, त्यांना ते पूर्ण माहितेय की कसा पाठीत वार केला गेला आणि कोणत्या परिस्थितीत महाविकास आघाडीला आपल्याला जन्म द्यावा लागला होता,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

08:52 (IST) 26 Jul 2022
“गुंगीत जरी विचारलं असतं ना तरी मी ‘मातोश्री’ हेच उत्तर दिलं असतं”

“जेव्हा माझी शस्त्रक्रिया झाली, खरं तर दोन शस्त्रक्रिया झाल्या. तो अनुभव माझा वेगळा आहे. फार विचित्र अनुभवातून मी गेलोय. त्या वेळेला जेव्हा अॅनेस्थेशियामधून मला जागवले. ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर अॅनेस्थेशियातून बाहेर पडताना मला डॉक्टरांनी विचारले की, सर कुठे जायचं? ‘मातोश्री’ की ‘वर्षा’? मी पटकन म्हटलं- मातोश्री! तेव्हा मी डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर, तुम्ही मला अॅनेस्थेशिया दिला तेव्हा गुंगीत जरी विचारलं असतं ना तरी मी ‘मातोश्री’ हेच उत्तर दिलं असतं,” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.

08:50 (IST) 26 Jul 2022
“हेच आशीर्वाद शिवसेनेला बळ देतील”

“शिवसचं तरुण आणि युवांशी नातं शिवसेनेच्या जन्मापासूनच आहे. मात्र एक आहे, अजूनही मोठय़ा संख्येने ज्येष्ठ शिवसैनिक येऊन भेटताहेत. ज्यांनी बाळासाहेबांसोबत काम केलं आहे, ज्यांना आपण पहिल्या पिढीचे म्हणू. ज्यांनी शिवसेनेचा संघर्ष पाहिलाय. स्वतः संघर्ष केलाय. त्यांना शिवसेना म्हणजे काय ते नेमकं कळलेलं आहे. त्यांना शिवसेनेकडून काही मिळावं ही अपेक्षा नव्हती आणि आजही नाही. पण ते येऊन आशीर्वाद देताहेत.

08:48 (IST) 26 Jul 2022
“झडलेली, सडलेली पानं केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे?”

“सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती पानं सगळं झाडाकडून घेऊनही ती गळून पडताहेत. आणि हे बघा, झाड कसं उघडंबोडपं झालंय असं दाखवायचा ते प्रयत्न करताहेत. पण दुसऱया दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो. झडलेली, सडलेली पानं केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे? आता नवीन कोंब फुटायला लागले आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

08:44 (IST) 26 Jul 2022
“माझे वडील का चोरताय? तुम्ही मर्द नाहीत”

“ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सुनावलं आहे.

08:43 (IST) 26 Jul 2022
” 2014 साली भाजपाने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं?”

“शिवसेनेचं राजकारण हिंदुत्व मजबूत होण्यासाठीच ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, 2014 साली भाजपाने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं? काहीच सोडलं नव्हतं. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिलं हीच शिवसेनेची ताकद आहे. आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोपं घडवण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मी माझ्या तमाम शिवसैनिकांना, माताभगिनींना आणि बांधवांना विनंती करतो की, चला परत उठा. आता पुन्हा एकदा सामान्यांना असामान्य बनवूया,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

08:38 (IST) 26 Jul 2022
“सडलेली पानं झडलीच पाहिजेत”

“मी मागे एकदा माझ्या मनोगतात म्हटलं होतं की, ज्या वेळी मी ‘वर्षा’त राहात होतो तेव्हाचा अनुभव कथन केला होता. या घराच्या आवारातच दोन झाडं आहेत. एक आहे गुलमोहराचं आणि दुसरं आहे बदामाचं. दोन्ही झाडं मी साधारणतः गेली दोन-एक वर्षे बघतोय. ज्याला आपण पानगळ म्हणतो. त्यात पानं पूर्ण गळून पडतात. फक्त काडय़ा राहतात. आपल्याला वाटतं, अरे या झाडाला काय झालं? पण दोन ते तीन दिवसांत पुन्हा नवीन कोंब येतात, अंकुर येतात आणि मी बघितलंय, आठ ते दहा दिवसांत ते बदामाचं झाड पुन्हा हिरवंगार झालं. गुलमोहरसुद्धा हिरवागार झाला. म्हणून ही सडलेली पानं असतात ती झडलीच पाहिजेत. जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत. त्यांना झडून जाऊ द्या,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

08:35 (IST) 26 Jul 2022
“इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात”

“खरं सांगायचं तर मला चिंता नाहीये. चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकूल नाहीये. मात्र थोडीफार चिंता आहे ती नक्कीच मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे. याचं कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत माननीय शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंटय़ांच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय याची मला चिंता आहे. म्हणून मी जे म्हटलं की, हा पालापाचोळा सध्या उडतोय; तो उडू द्या. इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात. म्हणजे नवी पालवी फुटेल,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

08:33 (IST) 26 Jul 2022
“वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो”

“वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो. तो पालापाचोळाच उडतोय सध्या. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर नक्कीच येणार आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

08:32 (IST) 26 Jul 2022
“करोनातून आणि त्या संकटातून बाहेर पडलो याचा आनंद”

“गेल्या वर्षी जेव्हा मुलाखत घेतली होती तेव्हा करोनाचा कहर होता. त्या करोनामध्ये जे काही करता येणं शक्य होतं ते मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि अभिमानाने सांगेन की, माझ्या राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून मी केलं. त्यावेळी लॉकडाऊन होतं; मंदिरे बंद होती; सणासुदींना बंदी होती. पण या वर्षी आपण पहिल्यांदाच पंढरपूरच्या वारीत कोणतेही अडथळे येऊ दिले नाहीत आणि जल्लोषात ती पार पाडली. म्हणजेच पुन्हा एकदा सणासुदीला सुरुवात झाली आहे. आता दहीहंडी येईल, गणपती येतील, नवरात्र येईल, दिवाळी येईल. पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात उत्सव, उत्साह आणि आनंद याची सुरुवात झाली आहे. मध्यंतरी जणुकाही एक ‘पॉज’ बटण दाबलं गेलं होतं. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण करोनातून आणि त्या संकटातून बाहेर पडलो. मला आनंद आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

08:31 (IST) 26 Jul 2022
बाहेर इतकं वादळ माजलंय तरीही तुम्ही इतके शांत दिसताय?

बाहेर इतकं वादळ माजलंय तरीही तुम्ही इतके शांत दिसताय? असं संजय राऊतांनी विचारलं असता उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “हे रहस्य फार गुंतागुंतीचं नाहीय. तुम्ही जाणता, माझी माँ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आलेलं हे रसायन आहे. माँ म्हटल्यानंतर शांत, सौम्य, संयम आणि साहजिकच आहे, बाळासाहेब म्हटलं तर वर्णन करण्याची आवश्यकताच नाही. बाळासाहेब काय होते हे महाराष्ट्रच नव्हे तर अवघा देश जाणतो. थोडंफार ते रसायन आलंय माझ्यात”.

08:23 (IST) 26 Jul 2022
या ठिकाणी मुलाखत लाईव्ह पाहू शकता

युट्यूबवर या लिंकवर तुम्ही मुलाखत लाईव्ह पाहू शकता

07:59 (IST) 26 Jul 2022
सकाळी ८.३० वाजता प्रसिद्ध होणार मुलाखत

उद्धव ठाकरेंची ही रोखठोक मुलाखत सकाळी ८.३० वाजता प्रसिद्ध होणार आहे. लोकसत्ता डॉट कॉमच्या LoksattaLive या युट्यूबवर चॅनेलवरही तुम्ही ही मुलाखत पाहू शकता.

या मुलाखतीनंतर पुन्हा एकदा शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.