कर्जत : तालुक्यातील मध्यम प्रकल्प सीना धरण निर्मितीनंतर आज, शनिवारी सकाळी प्रथमच जूनमध्ये ‘ओव्हरफ्लो’ झाले. धरणात आता २.४ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. तेवढीच धरणाची क्षमता आहे. धरण भरल्यामुळे ४४५ क्युसेक क्षमतेने विसर्ग सोडण्यात आला आहे.

धरणाचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार शेळके, सहायक अभियंता संभाजी पवार व कालवा निरीक्षक प्रकाश जाधव यांनी ही माहिती दिली. कर्जत तालुक्यातील २१ व श्रीगोंदा, आष्टी तालुक्यातील अनेक गावांना सीना धरण लाभदायक आहे. धरणाची निर्मिती १९८५ मध्ये झाली. तत्पूर्वी दुष्काळी परिस्थितीत १९७२ मध्ये धरणाचे काम सुरू करण्यात आले होते.

यंदा अवकाळी पावसाने मे महिन्यात व जूनच्या सुरुवातीला झोडपले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरण निर्मितीनंतर प्रथमच पावसाळा सुरू होण्यापूर्वीच भरले. गेल्या वर्षी कुकडी कालव्याच्या ओव्हरफ्लोच्या आवर्तनाने सीना धरण भरले होते. या धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या निमगाव गांगर्डा, मिरजगाव, रातंजन, घुमरी, बेलगाव, बाबुळगाव, नागलवाडी, नागापूर, शिरपूर, माही जळगाव, पाटेगाव, निंबोडी, टाकळी खंडेश्वरी, पाटेगाव, तरडगाव, नवसरवाडी, आनंदवाडी, मलठण, निमगाव डाकू, पाटेवाडी या गावांना धरणाचा लाभ होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतर्कतेचा इशारा

निर्मितीनंतर धरण प्रथमच जूनमध्ये पूर्ण क्षमतेने भरले. धरणातून ४४५ क्युसेकने विसर्ग सोडला आहे. आणखी पाऊस पडल्यास आणखी विसर्ग सोडावा लागेल. त्यामुळे धरण व नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. संदीपकुमार शेळके, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग