नागपूर/अमरावती/पुणे : जुलैमधील अतिवृष्टीमुळे विदर्भ आणि मराठवाडय़ातील खरीप हंगाम मातीमोल झाला आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार विदर्भ आणि मराठवाडय़ात ८ लाख ५७ हजार ३७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर ३ हजार ७९३ हेक्टर शेतजमीन पुरामुळे खरडून गेली आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे झाल्यानंतर नुकसानीच्या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जुलैच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मोसमी पावसाने विदर्भ आणि मराठवाडय़ाला अक्षरश: झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे खरिपात पेरणी केलेली पिके १५ दिवसांपासून पाण्याखालीच आहेत. नदी, ओढे, ओहळाकाठावरील शेतीजमीन पुराच्या पाण्यात खरडून गेली आहे. आपण पेरणी केलेले शेत हेच का? असा प्रश्न पडावा, अशी शेतजमिनींची अवस्था झाली आहे. मोठा आर्थिक खर्च करूनही खरडून गेलेल्या जमिनी पुढील दोन-तीन वर्षे शेती योग्य होणार नाहीत. विदर्भाचे एकूण लागवड क्षेत्र ५१ लाख ८५ हजार ९०३ हेक्टर आहे. त्यापैकी ७० टक्के म्हणजे ३७ लाख ८५ हजार हेक्टरवर लागवड झाली. प्राथमिक अंदाजानुसार, यापैकी ५ लाख ७० हजार हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचा दौरा केला. प्रशासनाने सर्वेक्षण करताना मानवी दृष्टिकोन बाळगावा, अशा सूचना त्यांनी केल्या. येत्या ३० जुलैपर्यंत नुकसानीचा अहवाल तयार होणे अपेक्षित असून सततच्या पावसामुळे अंतिम पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. मराठवाडय़ातील चित्र - अतिवृष्टीचा नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका. - नांदेड, अर्धापूर, मुदखेड, कंधार, लोहा, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव, धर्माबाद, उमरी, किनवट, भोकर, हदगाव हिमायतनगर आणि माहूर तालुक्यांतील २९, ७,४३२ हेक्टरवरील पिके मातीमोल. - हिंगोलीत वसमत, कळमनुरी, हिंगोली तालुक्यांत ७६ हजार ७७१ हेक्टरवरील पिके जमीनदोस्त. - बुलडाण्यातील चिखली मेहकर, शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यांत ६ हजार ९९२ हेक्टरचे नुकसान. विदर्भातील अवस्था * अमरावती विभागात कापूस आणि सोयाबीनला फटका * तूर, उडीद, मूग आणि भाजीपाला पिकांचीही नासाडी * चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात दुबार पेरणी करणाऱ्यांचे नुकसान * पावसामुळे अंतिम पंचनामे करण्यात अडचणी * नदी, नाल्यांकाठच्या शेतजमिनी पुरामुळे नापीक या पिकांचे नुकसान : कापूस, भात आणि सोयाबीन या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्या खालोखाल ज्वारी, तूर, कडधान्ये, भाजीपाला आणि संत्री, मोसंबी आदी फळपिकांचीही मोठी हानी झाली आहे.