गायींना होणारा ‘लम्पी स्किन डिसीज’ हा साथीचा आजार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात आणलेल्या चित्त्यांमुळे पसरला आहे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. दरम्यान, पटोलेंच्या या वक्तव्यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “नाना पटोलेंनाच लम्पी आजार झालाय, त्यांनी…” चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरल्याच्या विधानाचा बावनकुळेंकडून समाचार

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

“नाना पटोले यांचे विधान हास्यास्पद आहे. अशा पद्धतीने काँग्रेसचे नेते वक्तव्य करत असतील, तर जनतेने याची नोंद घ्यावी. खरं तर लम्पी हा आजार चित्ते भारतात येण्यापूर्वी आला आहे. त्यामुळे हा आजार चित्त्यांमुळे आला, असं म्हणणं म्हणजे काँग्रेस कशा पद्धतीने जनतेत भ्रम निर्माण करते, याचं उत्तम उदाहरण आहे”, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच “नवरात्रोत्सवात पटोलेंनी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी केलेला जोक असावा”, असा टोलाही त्यांनी नाना पटोले यांना लगावला आहे.

हेही वाचा – “नायजेरियातून मोदींनी आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला”; नाना पटोलेंचा अजब दावा

काय म्हणाले होते नाना पटोले?

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लम्पी रोगाबाबत अजब दावा केला होता. “लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहेत. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले,” असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते.