विदर्भातील नागपूर व चंद्रपूर, तसेच छत्तीसगडमधील महाऔष्णिक वीज केंद्रातून सल्फरडाय ऑक्साईडचे उत्सर्जन व इतर प्रदूषण ६० टक्क्याने वाढल्याने देशात हवामान बदलाचा आणि आरोग्याच्या मोठय़ा समस्या निर्माण झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष अमेरिकेच्या नासा या संस्थेने काढला आहे. नासाचे संशोधन ६ जानेवारी २०१४ ला प्रकाशित झाले आहे.
नासाच्या क्लायमेट चेंज उपक्रमामार्फत औरा उपग्रह व अर्थ ऑब्झव्र्हेटरीमार्फत २००५ ते २०१२ पर्यंत भारत, अमेरिका व चीनमधील महाऔष्णिक वीज केंद्राचा उपग्रहामार्फत सव्र्हे करण्यात आला. त्यानुसार चीन जगात प्रथम क्रमांकावर, भारत दुसऱ्या क्रमांकावर, तर अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर गेला. मात्र, २०११-२०१२ या वर्षांत भारतातील महाऔष्णिक विद्युत केंद्रातून मोठय़ा प्रमाणात वायू प्रदूषण केल्यामुळे भारत तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर गेला. नासाच्या उपग्रहीत चित्रात दाखविल्याप्रमाणे २००५ ते २००८ पर्यंत भारतातील झारखंड, नागपूर, चंद्रपूर वीज केंद्रातून उत्सर्जन कमी होते. मात्र, ते वाढत जाऊन २०११ ते २०१२ या वर्षांत ते ६० टक्के असल्याचे म्हटले आहे. एवढे मोठे प्रदूषण होत असतानाही भारताच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जगाला खोटी माहिती पुरवल्याची माहिती नासाच्या या अहवालात आहे.
केंद्रीय प्रदूषण मंडळाने २००१ ते २०१० दरम्यान भारतातील ३६१ प्रदूषण निरीक्षण केंद्रांच्या माध्यमाने निरीक्षणे घेऊन भारतातील सल्फरडाय ऑक्साईडचे सरासरी उत्सर्जन कमी झाल्याचे म्हटले होते, परंतु नासाच्या मते केवळ ७० निरीक्षण केंद्रे हे महाऔष्णिक वीज केंद्राच्या जवळ, तर २९१ केंद्रे हे मोठय़ा शहरात होती. त्यामुळे हे आकडे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
दोन हजार मेगाव्ॉट ऊर्जेसाठी सुमारे ३५ हजार मे. टन कोळसा दररोज जाळला जातो. त्यातून १५ हजार टन राख आणि १८० मे. टन सल्फरडाय ऑक्साईड वायू बाहेर पडतो. इतर उद्योगातही कोळसा जाळला जातो, तसेच तांबे व निकेल उद्योगातूनही हा वायू बाहेर पडतो.
हा वायू पर्यावरण व सजिवांसाठी दूषित आहे. ढगांमध्ये सल्फेट अॅरोसाल गोळा होते. त्यामुळे ढगात प्रदूषण होते. बाष्पांशी संयोग होऊन सल्युरिक अॅसीड तयार होते व आम्लवर्षां होते. त्यामुळे वनस्पती सजीवांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. जागतिक वातावरण बदलास हा वायू जबाबदार मानला जातो. त्यामुळे अति पाऊस, कमी पाऊस, उष्ण तापमानात कमालीची वाढ होते.
उपग्रहीय चित्र पुरेसे बोलके
चंद्रपूरच्या ५० किलोमीटर परिसरातील वातावरणात, नागपूर परिसरात ७५ किलोमीटपर्यंत, तर विदर्भातील ५०० किलोमीटपर्यंत परिघातील वातावरणात सल्फरडाय आक्साईड वायू पसरत असल्याचे उपग्रहीय चित्रात दिसत आहे. त्यामुळे विदर्भातील हवामानावर याचा गंभीर परिणाम होणे स्वाभाविक आहे. आधीच नासाने चंद्रपुरातील वायूचे प्रदूषण वाढल्याचे सांगितले होते. या वायूच्या सतत संपर्कामुळे दमा, श्वसनाचे आजार होतात. खोकला, डोळ्यांची जळजळ, गळा व फुफ्फुसात दुखणे, विशेषत: लहान मुलांनाही श्वसनाचे विकार बळावतात. ह्रदयरोगांनाही चालना मिळते. नासाने सतत आठ वष्रे अमेरिका, चीन व भारतातील महाऔष्णिक वीज केंद्रांचा अभ्यास केला.