परदेशात शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी गुण मिळल्याने ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा’ लाभ थांबवण्यात आला होता. याची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. याला आता राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुन्हा बहाल केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजना राबविण्यात येते. यामध्ये परदेशातील विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण फी, आरोग्य विमा व व्हिसा शुल्क मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. परंतु, अनेकदा नवे वातावरण व अन्य काही कारणांमुळे मुलांना एटीकेटी गुण मिळतात. यानंतर त्यांची शिष्यवृत्ती थांबवण्यात येते.

हेही वाचा : “एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार”, सुषमा अंधारेंच्या दाव्यावर उदय सामंत यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी गुण मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती. त्यामुळे त्यांना तेथे मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत राज्य सरकारकडे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता.

हेही वाचा : “संजय हा शब्दही शिवीसारखा वाटतो”; आशिष शेलारांची संजय राऊतांवर खोचक टीका, म्हणाले, “मी…”

त्यानंतर आता राज्य सरकारने ही शिष्यवृत्ती पुन्हा बहाल केली आहे. याबद्दल सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आभार मानले आहे. “ही अतिशय आनंदाची बाब असून, यामुळे सदर विद्यार्थ्यांचे शिक्षण आता पुन्हा व्यवस्थित होऊ शकेल,” असा विश्वास सुप्रिया सुळेंनी ट्विट करत व्यक्त केला आहे.