सोलापूर : सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉरचा राष्ट्रीय महामार्ग केंद्र सरकारने अखेर निश्चित केला असून हा मार्ग सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीसह उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या चार तालुक्यांतील ६१ गावांतून पुढे कर्नाटक राज्याला जोडला जाणार आहे. ग्रीन कॉरिडॉरबरोबरच सोलापूर शहरासाठी अतिशय महत्त्वाचा ठरलेल्या बाह्यवळण मार्गालाही केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी सुटण्याची आणि पर्यायाने स्थानिक व्यापार उदीम वाढण्याची सुचिन्हे दिसत होणार आहे. ग्रीन कॉरिडॉर आणि बाह्यवळण या दोन्ही मार्गासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जाणाऱ्या ग्रीन कॉरिडॉरची लांबी १५१ किलोमीटर आहे. बार्शी तालुक्यात १८ गावे, ३६ किमी, उत्तर सोलापूर-८ गावे, २४ किमी, दक्षिण सोलापूर-१५ गावे, ४३ किमी आणि अक्कलकोट-२० गावे, ४८ किमी याप्रमाणे तालुकानिहाय ग्रीन कॉरिडॉर मार्गावरील गावे आणि त्याचे अंतर निश्चित करण्यात आले आहे.

सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातून (१२ गावे) पुढे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात येणार आहे. बार्शीतून पुन्हा उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात (१८ गावे) हा महामार्ग जाऊन पुनश्च उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटमार्गे कर्नाटक राज्याला जोडला जाणार आहे. या ग्रीन कॉरिडॉरसाठी सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या गावांतील भूसंपादनाबाबत येत्या आठवडाभरात राजपत्र आणि नंतर अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. सहा महिन्यांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन भूसंपादन केले जाणार असल्याचा प्राथमिक माहिती उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अरुणा गायकवाड यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय सोलापूर शहरातील जड वाहतुकीमुळे होणारी कोंडी सुटण्यासाठी सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉरमधूनच बाह्यवळण मार्गही मंजूर झाला असून त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया येत्या सहा महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी पहिल्या पुणे-सोलापूर महामार्गावरील केगाव ते हत्तूर हा २२ किलोमीटर अंतराचा बाह्यवळण मार्ग पुढे कर्नाटकातील विजापूरकडे जाण्यासाठी तयार झाला आहे. त्यानंतर २५ किलोमीटरचा हत्तूर ते तांदूळवाडी आणि ३५ किलोमीटरचा तांदूळवाडी ते केगाव हा बाह्यवळण मार्ग तयार होणार आहे. या माध्यमातून सोलापूर-पुणे, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-विजापूर आणि रत्नागिरी-नागपूर हे चारही महामार्ग सोलापूर शहराभोवतीच्या बाह्यवळण मार्गाला जोडले जाणार आहेत.