रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाली आहे. रत्नागिरी, संगमेश्वर व लांजा या भागातून जाणा-या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा मुंबई गोवा महामार्गाचे गेले १८वर्ष काम सुरु आहे. तरी हा महामार्ग पुर्ण होवू शकला नाही. संपुर्ण देशात हा महामार्ग आता चर्चेचा विषय बनला आहे. पावसाला सुरु झाल्याने आता या महामार्गाचे काम मंदावले आहे. मात्र संगमेश्वर, रत्नागिरी व लांजा या ठिकाणी करण्यात आलेल्या कामांमुळे रस्त्याची भयानक अवस्था झाली आहे. पावसाच्या पाण्याने रस्त्यावरच चिखल आल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच या चिखलामुळे अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील चिखलाचे साम्राज्य, रस्त्याची दुर्दशा आणि वाहतुकीचा खोळंबा या विषयावर लांजा शिवसेना ठाकरे पक्षाच्या मागणीवरून तहसीलदारांनी बोलवलेल्या बैठकीत महामार्गाच्या अधिकारी आणि ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरण्यात आले. येत्या दोन दिवसात सर्विस रोड सह वाहतूक सुरळीत करा अन्यथा शिवसेना ठाकरे पक्ष स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराच शिवसेनेच्या पदाधिका-यांनी दिला आहे. तसेच याबाबत लांजा नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारण्यात आला आहे.

या बैठकीत शिवसैनिकांनी महामार्गाच्या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करुन ठेकेदार कशा पद्धतीने चुकीचे काम करत असल्याचे सांगण्यात आले. ठेकेदार पावसाळ्याच्या तोंडावर काम करत असल्याने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. महामार्गाच्या अधिकारी व ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले.जोपर्यंत सर्विस रोडचे काम होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे.

रत्नागिरीसह संगमेश्वर व लांजा भागात रस्त्याची झालेल्या दुरावस्थेमुळे काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. वाहन चालकांना महामार्गावरील कामाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लांजासारख्या शहराची वाट लावण्याचे काम बांधकाम विभागाने केले आहे. जाता येता या रस्त्यावरुन जीव मुठीत घेवून जावा लागतो. आज या अशा रस्त्यामुळे ‘भीक नको पण कुत्रं आवर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.- राजेंद्र सकपाळ, लांजा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संगमेश्वर एसटी डेपो ते आरवली आणि बावनदी या भागात गाडी चालवणे अवघड झाले आहे. रस्ता पुर्ण करण्या ऐवजी आधी टोल नाके उभारण्यात बांधकाम खाते व्यस्त आहे. आमचा जीव जात आहे, याकडे बघण्यास सरकारला वेळ नाही असेच दिसत आहे. – अक्षय खटकूळ, वाहन चालक, आरवली, संगमेश्वर.