भाजपविरोधी ऐक्यासाठी आज (२३ जून) पाटण्यात महाआघाडीची पहिली बैठक पार पडत आहे. या बैठकीत जागावाटपाच्या प्रमुख मुद्दय़ावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीला उद्धव ठाकरेही हजर राहिले आहेत. यावरून शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीमध्ये किमान २० भाजपेतर पक्षांचे प्रमुख व नेते सहभागी झाले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती हजर राहिले असून महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकेरही उपस्थित आहेत. दिल्लीतून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के. सी वेणुगोपाल, जयराम रमेश आदी नेतेही पोहोचले आहेत.
हेही वाचा >> संयुक्त विरोधी पक्षांच्या बैठकीवरून संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना प्रश्न; म्हणाले, “मेहबुबा मुफ्तींसह…”
“देशामध्ये विरोधी पक्षनेता मजबूत असला पाहिजे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरही अंकुश ठेवता येतो. आजच्या बैठकीला ठाकरेसुद्धा जात आहेत. एकीकडे बिहारींना हाकलणारे आज बिहारमध्ये जाऊन बैठकीला बसताहेत. हे झालेलं परिवर्तन पाहून मलाच धक्का बसला आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.
कर्नाटकात काँग्रेसने जी जादू चालवली तशी इतर राज्यात करण्यासाठी सध्या काँग्रेस देशपातळीवर प्रयत्न करत आहे. त्यावर, संजय शिरसाट म्हणाले की, “प्रत्येक राज्याचं वेगळं समीकरण असतं. अनेक राज्याची इतर राज्यांशी तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक राज्याची समस्या वेगवेगळी असते. तिथले राजकारण वेगळं असतं. जो तो आपल्या राज्यात मजबुतीने उभं राहण्याचा प्रयत्न करतो.”
हेही वाचा >> “आजच चमत्कार…”, विरोधकांच्या बैठकीआधी संजय राऊतांचं वक्तव्य, म्हणाले, “२०२४ च्या निवडणुकीआधी…”
“प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगवेगळी आहे. या सगळ्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. राहुल गांधींना देशाशी घेणंदेणं आहे. ममतांना आपल्या राज्याशी घेणं आहे. त्यामुळे राहुल गांधींचं मत त्यांच्यावर लादलं जाऊ शकत नाही. त्यामुळे ही आघाडी होणार नाही, हे माझं प्रामाणिक मत आहे”, असंही शिरसाट म्हणाले.