संपूर्ण एप्रिल महिना वेगाने वाढणारी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या मे महिन्याच्या शेवटाकडे येता येता उतरू लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नव्याने सापडणाऱ्या करोनाबाधितांची संख्या सातत्याने ३० हजारांच्या खालीच राहात असून ती आता वीस हजारांच्या घरात पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात एकूण २० हजार ७४० नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा ५६ लाख ९२ हजार ९२० इतका झाला आहे. मात्र, त्यातले फक्त २ लाख ८९ हजार ०८८ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात करोनाचे उपचार घेत आहेत. तर ५३ लाख ०७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट कालपेक्षा किंचित वाढून ९३.२४ टक्के इतका झाला आहे.

दरम्यान, राज्यातील मृतांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून ५०० च्या खाली उतरला आहे. आज दिवसभरात राज्यात ४२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातला मृत्यूदर १.६४ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, मृतांचा आकडा नियंत्रणात कसा आणता येईल आणि मृत्यू टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे. आजच्या आकड्यांची भर पडल्यानंतर राज्यात आत्तापर्यंत करोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा ९३ हजार १९८ इतका झाला आहे.

 

दरम्यान, मुंबईतील आजच्या आकडेवारीनुसार मुंबई महानगर पालिका क्षेत्रात आज दिवसभरात ९२९ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यासोबत १२३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, त्याचवेळी ३० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला आहे. पालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, मुंबईतली आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या ७ लाख ३ हजार ४६१ इतकी झाली आहे. त्याचवेळी बऱ्या झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा ६ लाख ५८ हजार ५४० इतका झाला आहे. तर मृतांची एकूण संख्या १४ हजार ८०८ इतकी झाली आहे.