महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी जाहीर केली होती. त्याचवेळी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठीही टोलमाफी देणार, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. त्यानुसार आज महाराष्ट्र सरकारने आदेश जारी केला आहे. गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोलमाफी जाहीर केली आहे.

त्यासाठी गणेशभक्तांना आरटीओ कार्यालयातून ‘टोल पास’ घ्यावा लागणार आहे. २७ ऑगस्टपासून हा आदेश लागू होणार आहे. आरटीओ कार्यालयातून घेतलेला ‘टोल पास’ दाखवून भाविक कोकणात जाऊ शकतात.

हेही वाचा- कल्याण : गणेशोत्सवात मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या पोलिसांच्या सूचना

२७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग व इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवर असणाऱ्या टोल नाक्यांवरून जाण्याऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. पण यासाठी आरटीओ कार्यालयात ‘टोल पास’ घेणं अनिवार्य आहे.