नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मीयांनी प्रवेश करण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यावरुन निर्माण झालेला वाद हा काही शमताना दिसत नाही. अशात आता आम्ही आमच्या आजोबांपासून त्र्यंबकराजाला धूप दाखवत आहोत. पण ही प्रथा आता आम्ही बंद करतो आहोत असं उरुस आयोजक सलीम सय्यद यांनी म्हटलं आहे. पुढच्या वर्षीपासून त्र्यंबकराजाला धूप दाखवणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हटलं आहे सलीम सय्यद यांनी?

“त्र्यंबकेश्वर राजाला उरुस असताना धूप दाखवण्याची परंपरा ही आमच्या आजोबांपासून चालत आलेली आहे. आम्ही ही परंपरा जपली. मात्र असं काही होईल हे वाटलं नव्हतं. त्यामुळे आता कुठेतरी थांबावं असं वाटतं आहे. आमच्याकडून चूक झाली असल्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला माफ करावं. पुढच्या वर्षीपासून आम्ही त्र्यंबकराजाला धूप दाखवणार नाही.” असं उरुस आयोजक सलीम सय्यद यांनी जाहीर केलं आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये आयोजित करण्यात आली होती ग्रामसभा

आज त्र्यंबकेश्वरमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजाचे नागरिक होते. आज त्र्यंबकेश्वर मंदिराचं गोमूत्र शिंपडून आणि फुलं वाहून शुद्धीकरण करण्यात आलं. याबाबत विचारलं असता सलीम सय्यद म्हणाले की, जे काही घडलं ते काही चांगलं घडलं नाही. आमची विनंती आहे की चुकलं असेल तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागतो असं सलीम सय्यद यांनी म्हटलं आहे. यानंतर आम्ही धूप दाखवण्याची प्रथा बंद करु. जे काही वातावरण चिघळलं आहे त्यामुळे आम्ही प्रथा बंद करतो आहोत असं सलीम सय्यद यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सलीम सय्यद यांनी हे वक्तव्य केलं आहे.

गावात आजपर्यंत कधीच वाद झाला नाही

गावात आम्ही सगळे एकत्र वाढलो आहोत. कधीही वाद झाला नव्हता. मात्र हा जो वाद झाला त्यामुळे आम्ही आता उरुसच्या दरम्यान असलेली ही प्रथा आम्ही बंद करतो. माझे वडीलही ही प्रथा पाळत होते. त्याआधीही आजोबाही प्रथा पाळायाचे. आता यापुढे म्हणजे पुढच्या वर्षीपासून आम्ही त्र्यंबकेश्वर राजाला धूप दाखवणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे हे वादाचं प्रकरण?

त्र्यंबकेश्वर येथे १३ मे रोजी दुसऱ्या धर्माच्या एका गटाकडून यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा मंदिर परिसरात थांबली. देवाला धूप दाखवू द्या, असा आग्रह त्या गटाने धरला. पुरोहितांनी त्याला विरोध दर्शविला. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदूधर्मीयांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. पुरोहितांच्या विरोधाचे तेच कारण होते. या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.