तुळजापूरमध्ये कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या दोन महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली असून स्वप्नाली गणेश पाटील (वय २५) आणि वैष्णवी पाटील (वय २०) अशी या महिलांची नावे आहेत. दोघीही नात्याने सख्ख्या जावा आहे.

पिंपळा (बु.)  येथील स्वप्नाली व वैष्णवी पाटील या सख्ख्या जावा बुधवारी सकाळी त्यांच्या शेतातील बंधाऱ्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. बंधाऱ्यात १७ फूट पाणी होते. कपडे धूत असताना यातील एक जण पाय घसरुन पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दुसरीने पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघीही बुडू लागल्या. हा प्रकार शेजारील एका महिलेला लक्षात आला. तिने याची माहिती ग्रामस्थांना दिली.  ग्रामस्थ येईपर्यंत दोघींचा मृत्यू झाला होता. स्वप्नाली पाटील यांच्या पश्चात पती व दोन मुले आहेत. तर वैष्णवी यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते.