लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिकठिकाणी महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा सुरु आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नांदेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपा, शिंदे गटासह अजित पवार गटावर हल्लाबोल केला. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे ४८ खासदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच अशोक चव्हाण भाजपात गेल्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“महाराष्ट्रात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तेव्हा दोन टोकाच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्याचे नेतृत्व माझ्याकडे होते. त्या दोन वर्षांमध्ये सर्वच मित्र पक्षांनी खूप सहकार्य केले. मात्र, मधल्या काळात गद्दारी झाली नसती तर महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन गेले असते. त्यावेळी आम्ही निवडणुका वेगळ्या लढलो होतो, पण सरकर स्थापन केले होते. जसे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकमत होते तसेच आताही आहे. सध्या मित्र पक्षांचे सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करतील”, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : एकनाथ शिंदेकडे खरंच पैशांचं गोदाम? आदित्य ठाकरेंच्या आरोपांबाबत मुख्यमंत्री म्हणाले…

“देशामध्ये हुकूमशाहीच्या विरोधात एक लाट उसळली आहे. सर्वांच्या मनामध्ये सध्या एक भिती आहे की हे संविधान बदलतील. गेल्या काही वर्षांत त्यांची वाटचाल त्याच दिशेने आहे. या प्रचाराच्या दरम्यान काही शेतकरी भेटतात. त्यावेळी शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष असल्याचे दिसते. शेतकरी स्वत:हून सांगत आहेत की, यावेळी आमचे मत महाविकास आघाडीला. कारण महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेच्या सातबाऱ्यावर गद्दाराचे नाव

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “एका शेतकऱ्यांने एक मुद्दा सांगितला, तो मुद्दा माझ्याही काळजाला भिडला. मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या सातबाऱ्यावर गद्दाराचे नाव लिहिले. उद्या यांचे सरकार आल्यावर आमच्या सातबाऱ्यावर दुसऱ्याचे नाव लिहिले तर आम्ही कोणाकडे जायचे, अशी भिती आता वाटायला लागली आहे. सातबारा बदलण्याचा धोका आता शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे. मोदी शिवसेनेला नकली शिवसेना म्हणाले होते. उद्या हे आम्हालाही नकली शेतकरी म्हणतील. मग आम्ही कोणाकडे दाद मागायची”, असे एका शेतकऱ्याने सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.