Uddhav Thackeray : इंडिया आघाडीची प्रचारसभा बीकेसी येथील मैदानात पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, नाना पटोले, मल्लिकार्जुन खरगे यांची भाषणं पार पडली. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. मुंब्र्यात शिवरायांचं मंदिर बांधून दाखवा असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्यावर उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) खोचक शब्दांत टीका केली. तसंच मुंबईकर आम्हाला आशीर्वाद देतील आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) व्यक्त केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“दिवाळी संपली आहे. आता राजकीय फटाके सुरु झाले आहेत. आपल्याकडे चांगले आयटम बॉम्ब आहेत. पलिकडच्या बाजूला फुसकुल्या, फुलबाज्या जे काही चाललं आहे ते चालुदेत. मी जाहीर सभा सुरु केल्या. त्याआधी मला सांगण्यात आलं अजून निवडणूक प्रचार काही भरीस आलेला दिसत नाही. त्यावर मी म्हटलं की जरा लोकांना फराळ खाऊदेत. पण फराळातून अनेक पदार्थ आज घडीला गायब झालेत कारण महागाई प्रचंड वाढली आहे.” असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) त्यांच्या भाषणात म्हणाले.

आम्ही काळोखात कुठल्याही गोष्टी करत नाही

राहुल गांधींनी भाषणात सांगितलं की कर रुपाने ९० हजार रुपये कसे काढले जात आहेत. उद्या श्वास घ्यायलाही टॅक्स लावतील. ही एक चांगली सभा आयोजित झाली आहे. कारण आपण जे करतो ते प्रकाशात करतो, आपलं सगळं काही खुलेआम असतं. काळोखात आम्ही काही करत नाही. महिलांसाठी जी योजना आहे ती नुसती सुरु ठेवणार नाही त्यात भर घालणार असं राहुल गांधींनी जाहीर केलं आहेच. शरद पवार यांनी शेतकऱ्यांचं कर्ज ३ लाखांपर्यंत माफ करणार हे सांगितलं. आम्ही काही वाऱ्यावरची वरात म्हणून ही आश्वासनं दिलेली नाहीत. धारावीचा मुद्दा हा आपल्या वचननाम्यात असणार आहे, असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान “छत्रपती शिवरायांचं पहिलं मंदिर मुंब्र्यात उभारुन दाखवा, आम्ही..”

धारावी आता पुन्हा वाचवण्याची गरज आहे

आम्ही करोनाच्या काळात धारावी वाचवली होती आता पुन्हा धारावी वाचवणार आहोत. कारण कंत्राटदारांचे लाड करणारं हे सरकार आहेत. कोळीवाड्यांचं क्लस्टर करण्याचं चाललं आहे. आम्ही कोळीवाडे किंवा गावठाणं आम्ही अदाणी किंवा कुणाच्या घशात जाऊ देणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. जर कोळीवाड्यांना क्लस्टरमध्ये टाकलं त्यांना इमारती बांधून दिल्या तर कोळी बांधव त्यांच्या होड्या काय पहिल्या-दुसऱ्या मजल्यावर लावणार? मासे गच्चीत वाळत घालणार का? लक्षात घ्या ही निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अस्तित्त्वाची लढाई नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचं गुजरातीकरण चाललं आहे ते थांबवण्यासाठी आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस यांना तिखट उत्तर

“मी दसऱ्याच्या सभेत सांगितलं होतं की आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आम्ही मंदिर बांधू. हे मी बोलल्यानंतर देवाभाऊ बोलले. कारण त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सहनच होत नाहीत. कसाबसा पुतळा उभारला तो पण आठ महिन्यांत पडला. शिवाजी महाराज म्हटल्यावर यांच्या अंगाची लाही लाही होते. देवेंद्र फडणवीसांनी मला आव्हान दिलं. तुम्हाला जर मंदिर बांधायचं असेल तर पहिलं मंदिर म्हणे मुंब्र्यात बांधून दाखवा. अहो देवाभाऊ जाऊ तिथे खाऊ, मुंब्र्यात जा. मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावर जे शिल्प आहे तिथे शिवाजी महाराज आहेत. जिजाऊ आहेत, तुकाराम महाराज आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. आधी ते जाऊन बघा. मुंब्रा ठाणे जिल्ह्यात येतो. ज्या जिल्ह्यातून तुम्ही आमच्यातला गद्दार फोडलात आणि डोक्यावर बसवला होता. त्याच्या जिल्ह्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणं अवघड वाटत असेल तर त्या गद्दाराला डोक्यावर घेतलाच कशाला ? वेडीवाकडी आव्हानं आम्हाला देऊ नका. जे तुम्ही बकाल करत आहात त्याला उत्तर म्हणून आम्ही चांगला जाहीरनामा घेऊन आलो आहोत.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) देवेंद्र फडणवीस यांना तिखट शब्दांत उत्तर दिलं आहे.