केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे, स्टॅलिन, ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांची नावं घेऊन पुन्हा एकदा घराणेशाहीवर प्रहार केला आहे. हे सगळेजण आज एकवटले आहेत कारण यांना राजकारण करुन कुटुंबाचं भलं करायचं आहे या आशायचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. तसंच उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायमच आरोपांच्या फैरी

अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात २०१९ मध्ये बंद दाराआड एक चर्चा झाली होती. या चर्चेत सगळं काही ५० टक्के वाटप भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये होईल असं ठरल्याचं उद्धव ठाकरे सांगतात. तर मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही आश्वासन दिलेलं नव्हतं उद्धव ठाकरे हे धडधडीत खोटं बोलत आहेत असं अमित शाह यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना युती तुटल्यापासून अमित शाह हे उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. महाविकास आघाडीचं सरकार २०२२ मध्येच गेलं आहे. मात्र उद्धव ठाकरेंवर टीका करणं आणि उद्धव ठाकरेंनी त्याला उत्तर देणं हे सुरुच आहे. आता थेट घराणेशाहीवरुनच उद्धव ठाकरेंवर अमित शाह यांनी आरोप केला आहे.

उद्धव ठाकरेंची महत्वाकांक्षा ही आहे की..

“इंडिया ही आघाडी वगैरे काही नाही. ही आघाडी म्हणजे काही सत्तालोलुप पक्षांचं एकत्र येणं आहे. या लोकांना आपल्या मुलांना, पुतण्याला, भाच्याला मुख्यमंत्री किंवा मंत्री किंवा पंतप्रधान बनवायचं आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हे सोनिया गांधी यांचं लक्ष्य आहे. तर उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं आहे. स्टॅलिन यांनाही त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं आहे. ममता बॅनर्जी यांना त्यांच्या भाचीला सत्तेत आणायचं आहे. यात आघाडी कुठे आहे? या लोकांना आपल्या कुटुंबाचं कल्याण करायचं आहे.”

इंडिया आघाडी म्हणजे संत्र्यासारखी

इंडिया आघाडीकडे मी संत्र्याप्रमाणे पाहतो. संत्र हे फळ वरुन दिसताना एकत्र दिसतं त्याची साल काढली की आपसुक त्याच्या फोडी वेगळ्या होतात. २०२४ चा निकाल लागला की हे लोक पळून जातील. मतमोजणीच्या दिवसापासूनच यांच्यात फूट पडेल. राहुल गांधी आमचे नेते नसते तर आम्ही जिंकलो असतो असंही हे म्हणतील. अशी बोचरी टीका अमित शाह यांनी केली आहे. टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमात अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे पण वाचा- “आम्ही मनोज जरांगेंच्या मागे असू तर मागच्या महिन्यात गुलाल कुणी उधळला? देवेंद्र फडणवीस यांनी..”, उद्धव ठाकरेंचं उत्तर

उद्धव ठाकरे उत्तर देणार का?

आता या सगळ्या टीकेनंतर उद्धव ठाकरे या आरोपाला उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उद्धव ठाकरे हे आत्तापर्यंत घराणेशाहीवर बोलताना कायमच हे म्हणत आले आहेत की होय मी घराणेशाही मानतो कारण शिवसेना माझ्या वडिलांचा पक्ष आहे. भाजपाला घराणं नाही, त्यामुळे विचारधाराही नाही. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या भाषणांमध्ये त्यांनी ही टीका केली आहे. आता या नव्या आरोपाला ते उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.