बुधवारी तेलंगणातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘बाळासाहेबांचे नकली पूत्र’ असा केला होता. तसेच सॅम पित्रोदांच्या या विधानावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. दरम्यान, या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते महाविकास आघाडीचे शिर्डीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“काल तेलंगणात पंतप्रधान मोदी यांची सभा झाली. या सभेत त्यांनी माझ्यावर टीका केली. कारण त्यांना सगळीकडे केवळ उद्धव ठाकरेच दिसत आहेत. काल तेलंगणाच्या सभेत बोलताना त्यांनी माझा उल्लेख ‘बाळासाहेबांचा नकली पूत्र’ असा केला. मोदीजी मी नकली असेल तर तुम्ही बेअकली आहात. हा माझा अपमान नाही. हा माझ्या वडिलांचा म्हणजेच बाळासाहेबांचा आणि माझ्या आईचा अपमान आहे. मोदींवर कदाचित आईवडीलांचे संस्कार झाले नसतील. पण माझ्यावर झाले आहेत. मी सुसंस्कृत घरातला आहे”, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं.

हेही वाचा – “…तर आदित्य ठाकरेंच्या कपाळावर लिहिलं पाहिजे मेरा बाप महागद्दार”, शिंदे गटातील शिवसेना नेत्याचा हल्लाबोल

“…मग तेव्हा लाज वाटली नाही का?”

“तुम्ही नोटबंदीच्या वेळी तुमच्या आईला रांगेत उभं केलं होतं. ९० वर्षांच्या माऊलीचा वापर तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी केला. तेवढा मी निर्देयी नाही. कारण ‘मातृदेव भव:’ आणि पितृदेव भव:’ हे माणणारं आमचं हिंदुत्व आहे. त्यामुळे तुम्ही जास्त बोलू नका, बाळासाहेब म्हणायच्या आधी हिंदुहृदयसम्राट म्हणायला शिका. नाही तर मी तुम्हाला शिकवणी लावतो. तुम्हाला हिंदुहृदयसम्राट म्हणायला जमत नसेल तर ते महाराष्ट्राची जनता तुम्हाल शिकवेल”, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना, “मी जर नकली असेल, तर प्रणव मुखर्जींना राष्ट्रपती करताना एनडीएचे घटकपक्ष म्हणून माझी सही घेतली होती. तेव्हा लाज वाटली नाही का? असा प्रश्नही त्यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर वाजपेयींनी मोदींना केराच्या टोपलीत टाकलं असतं”

“पंतप्रधान मोदी आज मला आणि माझ्या शिवसेना नकली म्हणत आहेत. मात्र, या ठाकरे घराण्याने या महाराष्ट्राची सेवा केली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये आम्ही भाजपाबरोबर होतो. त्यावेळी त्यांनी आमच्या पाठीत वार केले. त्यामुळे आम्ही त्यांची साथ सोडली, तर ते आम्हाला नकली म्हणत आहेत. बाळासाहेबांच्या पुत्राला नकली म्हणत आहेत. जर २००१ मध्ये बाळासाहेबांनी मोदींना वाचवलं नसतं तर अटलबिहारी वाजपेयींनी त्यांना केराच्या टोपलीत टाकलं असतं”, अशी टीकाही त्यांनी केली.