Uddhav Thackeray On Balasaheb Thackeray helped Amit shah : शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या बहुचर्चित पुस्तकाचं आज मुंबईत प्रकाशन पार पडलं. ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट पटकथालेखक जावेद अख्तर, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार व तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाचे नेते अमित शाह यांना मदत केली होती का? याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे.
संजय राऊता यांनी तुरूंगातील दिवसांबद्दल सविस्तर माहिती देणाऱ्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात ‘राजा का संदेश साफ हैं’ नावाचं एक प्रकरण लिहीले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच गुजरात दंगलीसह काही गुन्ह्यांच्या प्रकरणात अमित शाह अडकलेले असताना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शाह यांना कसं वाचवलं आणि तसेच दोघांमधील कथित भेटीबद्दल देखील या पुस्तकात लिहीण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप आणि चर्चांना उधाण आले आहे. या सर्व चर्चेबद्दल उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडली आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांत संजय राऊत यांच्या मुलाखती येत आहेत, आणि पुस्तकातील काही प्रसंग चर्चिले जात आहेत त्यामध्ये अमित शाह यांच्या प्रसंगाचाही उल्लेख आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. “मला जर कोणी विचारलं की अमित शाह तुमच्या घरी आले होते का? बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती का? तर मी सांगेन मला आठवत नाही. कारण आपल्या घराण्याने आपल्या वाडवडीलांनी कोणावर उपकार केले असतील तर ते मोजायचे नसतात. उपकार हे करायचे असतात पण मोजायचे नसतात. उपकारांची फेड कृतज्ञ नियतीने करायची की अपकाराने करायची हे ज्याच्या त्याच्यावर असते. कोणाला मदत करताना असा विचार आपण करू शकत नाहीत,” असे उद्धव ठाकरे म्हणले आहेत.