Solapur Markadvadi Repoll: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही अद्याप निकालावरील गोंधळ कमी झालेला नाही. विरोधकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला असून ठिकठिकाणी फेर मतमोजणीसाठी अर्ज केलेला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला असून आज पुन्हा एकदा मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर गावकऱ्यांनी मतदानाचा निर्णय मागे घेतला आहे. माळशिरसचे नवनिर्वाचित आमदार उत्तर जानकर यांनी या मतदानासाठी पुढाकार घेतला होता, त्यांनीच आता माघार घेण्याची घोषणा केली आहे.

मारकडवाडी या गावातून भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांना अधिकची मते मिळाली, असा आरोप निकालानंतर करण्यात येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय घेत, पुन्हा एकदा मतदान घेण्याची मागणी केली होती. त्यामुळेच मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र आज मतदानाबाबतची प्रक्रिया सुरू केल्यानंतर प्रशासनाने यासाठी विरोध केला. तसेच एक जरी मतदान टाकले गेले तर आम्ही मतपेट्या जप्त करू, असेही पोलीस प्रशासनाने सांगितले होते.

उत्तम जानकर काय म्हणाले?

मतदान रद्द झाल्यानंतर उत्तर जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “पोलीस प्रशासनाने जप्तीची कारवाई करणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी आधीच १४४ कलम लागू केले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी चर्चा करून मतदान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस जर मतदानच करू देणार नसतील आणि पेट्या उचलून नेणार असतील तर मतदान करण्याला अर्थ नाही. त्यामुळे आम्ही आगामी दिवसांत हजारो लोकांचा मोर्चा काढून आमचा आवाज पोहोचवण्याच प्रयत्न करू.”

भाजपाच्या उमेदवाराला दुप्पट मतदान कसे?

जानकर पुढे म्हणाले, या गावातून मला १४०० तर विरोधी उमेदवारांना ५०२ इतके मतदान झाले आहे. आम्ही सर्व माहिती घेतली आहे. तरीही विरोधी उमेदवाराला १००३ मतदान दाखविले गेले आहे. ईव्हीएममध्ये दुप्पट मते जात आहेत. त्यामुळे उत्तम जानकरला मिळालेले मतदान मशीनमधून भाजपाच्या उमेदवाराला कसे गेले? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही मतपत्रिकेवर निवडणूक घेत होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते किरण माने यांनी मारकडवाडीच्या ग्रामस्थांचे कौतुक केले आहे. “हुकूमशाही भित्री असते. बुळगी असते. फक्त तिच्यावर चाल करुन जायला असे निधड्या छातीचे, ताठ कण्याचे, सत्यवचनी बाण्याचे लोकशाहीचे खंदे सुपूत्र लागतात. भले ते हुकूमशहांच्या ‘सो कॉल्ड’ महाशक्तीपुढे संख्येनं कमी असतील… पण ते या शैतानाच्या टोळीला घाम फोडू शकतात”, अशी पोस्ट किरण माने यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे.