कोकणात गेले दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये आंबा व काजूचे सुमारे ५० ते ७० टक्के क्षेत्र बाधित झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या संकटाची शासनाने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी दिला आहे.  
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून त्यापैकी ५८ हजार ८३७ हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. कृषी खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ४८ हजार ७२९ हेक्टर क्षेत्र या पावसामुळे बाधित झाले आहे.
जिल्ह्यातील काजूचे एकूण क्षेत्र ८३ हजार २९२ हेक्टर असून, त्यापैकी सुमारे ४९ हजार ६७९ उत्पादनक्षम क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे.
या नुकसानीबाबत विभागीय कृषी अधिकारी अरिफ शेख यांनी सांगितले, की अवकाळी पावसामुळे  मोहोर धुतला गेला. अनेक ठिकाणी फळगळतीही झाली.
पिकावर भुरया रोग आणि तुडतुडय़ा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने आंबा बागायतदारांना सतर्कतेचा इशारा कृषी अधीक्षक के. बी. तरकसे यांनी दिला आहे.
कृषी विभागाने आंबा पिकासाठी हार्प स्वॅप ही योजना कार्यान्वित केली असून दर आठवडय़ातून दोन वेळा आंबा पिकाचे कीडरोग सर्वेक्षण केले जाते आहे. यासाठी ३५ सर्वेक्षण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
   रायगड जिल्ह्य़ातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अरिवद म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onआंबाMango
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rain in konkan hit 70 percent mango cashew crop
First published on: 03-03-2015 at 02:43 IST