Vaishnavi Hagawane राष्ट्रवादी पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेने शुक्रवार १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यावा अशी मागणी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे आणि स्वाती कस्पटे यांनी केली होती. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
१६ मेच्या दिवशी वैष्णवची आत्महत्या
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.
वैष्णवीच्या वडिलांनी काय सांगितलं?
वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा नवरा शशांक आणि सासरे राजेंद्र हगवणे यांनी आर्थिक कारणांमुळे तिला मारहाण केली. एकदा तिच्या वडिलांनी विचारले, “वैष्णवीच्या अंगावर इतक्या जखमा कशा?” यावर राजेंद्र आणि शशांक म्हणाले, “आधीच सांगितलं होतं, आम्हाला पैसे पाहिजेत. तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायचं? म्हणूनच तिला मारून टाकलं.” जावयाचे हे शब्द वडिलांचं काळीज चिरत गेले. सासरच्यांकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“वैष्णवीच्या मृत्यूचं प्रकरण ही माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे. वैष्णवीचं बाळ आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. बाळ सुखरुप राहिलं पाहिजे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. वैष्णवीचं बाळ हे तिच्या वडिलांकडे म्हणजेच आजोबांकडे पोहचलं आहे. वैष्णवीच्या मृतदेहावर जे वळ आढळून आले आहेत, ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत त्याच अनुषंगाने चौकशी केली जाईल. वैष्णवीच्या वडिलांचं जे म्हणणं आहे त्यावर आधारितच चौकशी केली जाईल” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, “मी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर अद्याप प्रसारमाध्यमांसमोर बोललो नव्हतो. उद्या मी कोल्हापूरला आणि परवा पुण्याला जाणार आहे. तिथे मी यावर सविस्तर बोलेन. तत्पूर्वी याबाबत एवढंच सांगेन की याप्रकरणी पोलीस ठाण्यात नमूद केलेल्या गुन्ह्यात शशांक राजेंद्र हगवणे (वैष्णवीचा पती) व आणखी काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. माझा त्यांच्याशी दुरान्वये संबंध नाही. मी फक्त त्या लग्नाला हजर होतो, एवढाच माझा त्यांच्याशी संबंध. लग्नाला गेल्यामुळे उगाच माझ्यामागे असं लचांड लागतं. मी सर्वांना बजावून सांगतो, उद्या मी कोणाच्या लग्नाला आलो नाही तर मला माफ करायचं, नाहीतर असं लचांड लागतं. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. आता या प्रकरणात आणखी काय काय पैलू समोर येतात ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.