महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. तरीही विद्यमान सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झाला नाही. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. मंत्रीमंडळ विस्तारावरून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही टीकास्त्र सोडलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या या कार्यकाळात मंत्रीमंडळ विस्तार होणारच नाही, अशी टीका अजित पवारांनी केली होती. यावरून शिंदे गटाचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं. मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, ही अजित पवारांची इच्छा लवकरच पूर्ण होईल, असं वक्तव्य केसरकर यांनी केलं. ते सिंधुदुर्ग येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- ईडीने चार तास चौकशी केल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

अजित पवारांच्या टीकेबाबत विचारलं असता दीपक केसरकर उपरोधिक स्वरात म्हणाले, “मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, ही जी अजित पवारांची इच्छा आहे. ती इच्छा लवकरच पूर्ण करण्यात येईल. कारण अजित पवारांनी सांगितलेलं सगळं आम्ही ऐकतो… त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचनेचं लवकरच पालन होईल.”

हेही वाचा- पंकजा मुंडे भाजपातून बाहेर पडणार? ठाकरे गटाकडून खुली ऑफर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दीपक केसरकर यांनी कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. ते म्हणाले, “मुंबईची ज्या वेगाने प्रगती होत आहे, तशीच प्रगती आम्ही कोल्हापूरची करत आहोत. महालक्ष्मी मंदिराजवळ आम्ही सगळ्या सुविधा निर्माण करत आहोत. छत्रपती शाहू महाराजांचं अनेक वर्षे रेंगाळलेलं शाहू मिलमधील स्मारक आम्ही सुरू करत आहोत. शाहू पुलाजवळ पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करून देतोय. पर्यटनाच्या दृष्टीने भारताच्या नकाशावर जयपूरचं जे स्थान आहे, तेच स्थान कोल्हापूरचं पुढच्या काळात असेल. कोल्हापूरचं वैभव जगासमोर नेणं, हे मोठं काम आहे. हे आव्हान पेलण्याची ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या प्रेमामुळे मिळते,” असंही केसरकर म्हणाले.