कराड : पश्चिम घाटक्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याचा अपवाद वगळता वळीव पावसाने दिलासा दिला आहे. कोयना धरण पाणलोटात तर तुरळक पाऊस आहे. मात्र, सर्वदूर ढगाळ वातारणात हलक्या सरी सुरूच आहेत. सततच्या पावसाने गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस ओसरत चालला आहे. त्यातून विस्कळीत जनजीवन पूर्वपदावर येत असून, शेतकऱ्यासह सामान्य जनता व यंत्रणेलाही तूर्तास तरी दिलासा मिळतो आहे.
आज मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या नऊ तासांत कोयना धरणक्षेत्रातील महाबळेश्वरला ६, नवजा, कोयनानगरला केवळ एक मि.मी. पावसाची नोंद आहे. धोम, धोम-बलकवडी, उरमोडी, कण्हेर, मोरणा, नागेवाडी आदी जलाशय परिसरात तुरळक सरींचे चित्र आहे.
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात ठिकाठिकाणी जोरदार तर, त्यातील गगनबावडा व राधानगरी तालुक्यातील अनेक मंडलात मुसळधार पाऊस दिसतो आहे. पश्चिम घाटात सर्वाधिक ५० मि.मी. पाऊस दाजीपूरला असून, गगनबावडा तालुक्यातील कुंभी जलाशय परिसरात ४९, गगनबावडा येथे ४५, तांदूळवाडी २८, मांडुकली २४, रेवाचीवाडी येथे २२ मि.मी. पाऊस झाला आहे. राधानगरी तालुक्यातील दुधगंगा धरणक्षेत्रात १५ तर, दाजीपूरला ५०, हसणे येथे ३४, पाडळी ३१, सावर्डे येथे १४ मि.मी. पावसाची नोंद आहे.
सातारा जिल्ह्यातील माणदेशचा टँकरवाडा हटण्यास मोठा आधार मिळाला असून, पाणी टँकरची संख्या ८० वरून १८ अशी लक्षणीय घातली आहे. खरीपपूर्व मशागती रखडल्या आहेत. तर, रब्बीच्या उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे. पाऊस ओसरल्याने महामार्गांसह अन्य रस्त्यांवर ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्याचा बऱ्यापैकी निचरा होताना जागोजागी भर पाण्यातून संथगतीने तसेच ठप्प राहणारी वाहतूक सुरळीत होताना दिसत आहे.