Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास सहा महिने होऊन गेले तरी अद्याप कर्जमाफीचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे निवडणुकीत महायुतीने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही सरकारकडून होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे सरकार सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी दिलेली आश्वासनं हवेतच विरले का? असा सवाल विरोधक करत आहेत.
यातच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही? याबाबत मोठं विधान केलं होतं. अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे भरण्याचं सांगितलं होतं. ‘सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही’, असं म्हणत अजित पवारांनी पीक कर्जाची परतफेड करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे महायुतीने दिलेला कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.
पण यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली आहे. तसेच महायुतीने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नसल्याचं सांगत योग्य वेळी राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२१ जून) पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, मग सरकारने कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी याआधी देखील याबाबत अतिशय सविस्तर सांगितलं आहे. कर्जमाफी कधी करायची? याबद्दल काही नियम आहेत. त्या संदर्भात त्याची एक पद्धत आहे. तसेच महायुतीच्या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. योग्य वेळी राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
कर्जमाफीबाबत अजित पवारांनीही केलं होतं भाष्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका जाहीर कार्यक्रमात कर्जमाफीबाबत काही दिवसांपूर्वी भाष्य केलं होतं. “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?”, असं विधान अजित पवार यांनी केलं केलं होतं.