मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या जागेवर असलेले १९ बंगले गेले कुठे याची चौकशी करा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली, कोर्लई ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  ग्रामपंचायतीने दिलेल्या माहिती नुसार त्या ठिकाणी बंगले होते. आता जर ते तीथे नसतील तर ही गंभीर बाब होती. ते बंगले गेले कुठे याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री खरे की रश्मी ठाकरे खऱ्या आहेत याची स्पष्टता व्हायला पाहीजे. रश्मी उध्दव ठाकरे यांना न्याय मिळवून द्ययचा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत पाच कोटी रुपयांची मालमत्ता त्यांना परत मिळवून द्ययची आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. भेटी दरम्यान प्रशासनाने सहकार्य केले, दोन दिवसात आवश्यक माहीती देण्याचे आश्वसन प्रशासनाने दिल्याचे सोमय्या यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले आहे.

   दरम्यान कोर्लई येथील १९ बंगल्यांच्या माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या रायगड जिल्ह्यत दाखल झाले. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष महेश मोहीते यांच्यासह भाजपचे कार्य भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते. पनवेल, पेण, पेझारी अलिबाग येथे त्यांचे भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. यानंतर दुपारी दिडच्या सुमारास ते कोर्लई गावात दाखल झाले. ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याशी १० मिनटे त्यांनी चर्चा केली. यानंतर ते रेवदंडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. बंगले कुठे गेले यांची चौकशी करण्यासंदर्भात तक्रार अर्ज त्यांनी यावेळी दाखल केला. त्यानंतर ते अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.

 सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोर्लई आणि रेवदंडा परीसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपुर्ण जिल्ह्यतून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्तासाठी बोलविण्यात आले होते. दंगल नियंत्रण पथक आणि शीघ्र कृतीदलाच्या तुकडय़ाही तैनात ठेवण्यात आल्या होत्या.त्यामुळे या परीसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. केंद्रीय सुरक्षा बलाचे जवानही सोमय्या यांच्या समवेत संपुर्ण दौऱ्यादरम्यान उपस्थित होते.

कोर्लई येथे शिवसेना भाजप कार्यकर्त्यांंत तणाव

रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या जागेवरील कथित बंगल्यांच्या पहाणी साठी भाजप नेते किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचायतीत आले होते. यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोमय्या यांना चौकशी साठी यायचे होते. तर कार्यकर्त्यांंची फौज कशाला आणली म्हणत शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे यावेळई पहायला मिळाले. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांंना थोपवून धरले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

गोमुत्र शिंपडून ग्रामपंचायतीचे शुध्दीकरण

सोमय्या यांच्या भेटीनंतर काही अती उत्साही शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडून ग्रामपंचायतीचे शुध्दीकरण केले. जोरदार घोषणाबाजी करून जल्लोषही साजरा केला. सोमय्या एकही कागदपत्राची पहाणी न करताच ग्रामपंचायतीतून निघून गेले. त्यांना फक्त दिखावा करायचा होता असा दावा सरपंच प्रशांत मिसाळ यांनी केला. तर सोमय्या शांततेत कार्यकर्त्यांं आणि झेंडे न घेता पहाणी करण्यासाठी आले असते तर शिवसेना आक्रमक झालीच नसती असे शिवसेनेचे जिल्हा परीषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी स्पष्ट केले.  

१९ बंगल्यांची कागदपत्रे खोटे असल्याचे राज्य सरकारने सिद्ध करावेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पी रश्मी ठाकरे रायगड जिल्ह्यतील मुरुड तालुक्यामधील कोर्लई गावात खरेदी केलेल्या १९ बंगल्यांची जी कागदपत्रे माझ्याकडे आहेत ते खोटे असल्याचे राज्य सरकारने सिद्ध करावेत. हे १९ बंगले कोणत्या कायद्यने कागदावरुन काढून टाकले ते दाखवावे, असे आव्हान भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारला दिले.

रश्मी ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी डॉ. किरीट सोमय्या शुक्रवारी (दि. १९) रायगडमध्ये आले होते. डॉ. सोमय्या प्रथम कोर्लई ग्रामपंचायतीत गेले. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात गेले. तेथून त्यांनी अलिबाग येथे येऊन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आ. प्रशांत ठाकूर व भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते होते. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या पत्रकारांशी बोलत होते.

रश्मी ठाकरे यांनी खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगलेच नाहीत. तर मग टॅक्स का भरला? हे बंगले जमिनीवरुन तसेच कागदावरुन देखील अदृश्य करण्यात आले आहेत. बंगले कागदावरुन काढून टाकण्याचा अधिकारी जिल्हाधिकार्?यांना आहे. सरकारला आहे असे जिल्हाधिकारी सांगतात. हा अधिकार कोणत्या कायद्यने त्यांना मिळाला हे त्यांनी सांगितले पाहिजे, असे डॉ. किरीट सोमय्या म्हणाले.

१९ बंगल्यांचे गुढ वाढत चालले आहे. हे बंगले कसे अदृश्य झाले हे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: स्पष्ट करावे, असे डॉ. सोमय्या म्हणाले. खासदार माझ्यावर व माझ्या मुलावर जे आरोप करतात त्याचे पुरावे त्यांनी द्यावेत. कोव्हिड सेंटरमधील घोटाळा प्रकरणातून लक्ष विचलीत करण्यासाठी संजय राऊत आमच्यावर आरोप करीत आहेत, असा आरोप डॉ. किरीट सोमय्या यांनी केला

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where did the 19 bungalows go investigate kirit somaiya abn
First published on: 19-02-2022 at 01:41 IST