महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील नाराज नेते शिशिर शिंदे हे शिवसेनेत प्रवेश करणार असे वृत्त आहे. राज ठाकरेंसोबत शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारे शिशिर शिंदे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. १९९१ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर शिशिर शिंदे यांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खणली होती. शिशिर शिंदे यांनी केलेली आंदोलने ही नेहमीच गाजली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटच्या नेत्यांमध्ये शिशिर शिंदे यांचा समावेश होता. आक्रमक स्वभाव आणि आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी यासाठी ते ओळखले जातात. शिवसेनेसाठी त्यांनी केलेले आंदोलने हे नेहमीच चर्चेचा विषय ठरायचे. १९९१ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी भारत- पाकिस्तान क्रिकेट मालिकेला विरोध दर्शवला होता. त्यावेळी शिशिर शिंदे हे काही कार्यकर्त्यांसह वानखेडे स्टेडियममध्ये घुसले आणि त्यांनी खेळपट्टी उखडून टाकली. ते यावरच थांबले नाही. त्यांनी खेळपट्टीवर इंजिन ऑईलही टाकले. त्यामुळे हा सामनाच रद्द करावा लागला होता. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी शिशिर शिंदे यांना महापालिकेत नगरसेवक म्हणून पाठवले होते. त्यांचे गाजलेले आणखी एक आंदोलन म्हणजे १९९० च्या दशकात सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना तेल टंचाईचा सामना करावा लागला होता. यानंतर शिशिर शिंदे यांनी थेट धारा तेलाचे ट्रक अडवले आणि त्याचे सर्वसामान्यांना वाटप केले. शिवसेनेत असतानाच शिशिर शिंदे हे राज ठाकरे यांचे समर्थक होते. २००५ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापनेचा निर्णय घेतला. त्यावेळी शिशिर शिंदे राज ठाकरेंसोबत होते. राज ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जायचे. २००९ च्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून त्यांना तब्बल १ लाख ९५ हजार मते मिळाली होती. तर त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भांडूप पश्चिममधून ते ३० हजारांहून अधिक मतांनी निवडून आले होते. निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी विधिमंडळात शपथविधी सोहळा सुरु होता. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्या शपथविधी दरम्यान मनसे आमदारांनी गोंधळ घातला होता. यातही शिशिर शिंदेचा समावेश होता. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये मनसेत त्यांना डावलले जात होते. शिशिर शिंदेंचे वर्चस्व असलेल्या भागातही त्यांना विचारात न घेता उमेदवारी दिली गेली, असे सांगितले जाते.