अलिबाग– कर्जत येथे ठाकूरवाडी गावाच्या हद्दीत रेल्वे मार्गालगत एका सुटकेस मध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. महिलेची हत्याकरून तीचा मृतदेहाचा मृतदेह सुटकेस मध्ये ठेवण्यात आला होता. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गा लगत ठाकूरवाडी गावाच्या हद्दीत एक मोठी सुटकेस आढळून आली. पोलीसांनी या सुटकेसची उघडून तपासणी केली असता त्यात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. २८ ते ३२ वर्षीय या महिलेची हत्याकरून चेहरा आणि डोक्याला प्लास्टिकच्या पिशवीने बांधण्यात आले होते. हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधून मृतदेह गुलाबी रंगाच्या एका टॉली असलेल्या सुटकेस मध्ये ठेवण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तीचा मृतदेह रेल्वे मार्गालगत टाकून देण्यात आला असावा असा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०१३ चे कलम १०३(१), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड पुढील तपास करत आहेत. मृतदेहाची ओळख पटवून आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलीसांसमोर असणार आहे. गेल्या महिन्याभरातील सुटकेस मध्ये मृतदेह सापडण्याची रायगड जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी पेण तालुक्यातील दुरशेत फाटा येथे नदी किनारी एका सुटकेस मध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. अशातच कर्जत मध्ये पुन्हा एकदा सूटकेस मध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही घटनामधील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.