महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. शिंदे गटातील आमदारांना ईडी (सक्तवसुली संचालनालय) आणि पैशांचं आमिष दाखवून शिंदे गटात सामील करून घेण्यात आलं आहे, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. आमदार-खासदार विकत घेतले तरी तुम्ही शिवसेना संपवू शकत नाही. शिवसेना संपवणारा माणूस अद्याप जन्मालाच आला नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “…तर ते वेगळं चिन्ह ठरवू शकतात” धनुष्यबाणाच्या वादावरून शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

बिहारमधील राजकीय घडामोडीवर भाष्य करताना विनायक राऊत म्हणाले की, “भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या बॉसिंगगिरीला कंटाळून नितीशकुमार त्यांच्यापासून दूर गेले आहेत. आता महाराष्ट्रातील शिवसेना, देशातील शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कटकारस्थानामुळे पूर्वीपेक्षा अधिक गतीने उभी राहत आहे. भलंही त्यांनी ४० आमदार विकत घेतले असतील, १२ खासदार विकत घेतले असतील, पण ते शिवसेनेला संपवू शकत नाहीत. शिवसेनेला संपवणारा माणूस या भारतामध्ये अजून जन्माला आलेला नाही आणि तो येणारही नाही, अशी टीका विनायक राऊतांनी केली आहे.