स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करू न देणे हा प्रेमातला एक भाग आणि दुसऱ्याचं अस्तित्व हिरावून न घेणे हा दुसरा भाग. बुद्धांनी म्हटलं होतं, ‘फूल आवडतं तेव्हा स्वत:साठी तुम्ही ते तोडून घेता, पण जेव्हा तुमचं फुलावर प्रेम असतं तेव्हा तुम्ही ते तोडत नाही तर त्याची निगा राखता.’ प्रेमाचं नाणं म्हणूनच वाजवावं लागत नाही. ते वाजतंच! आणि ते वाजलेलं जगाला कळत नाही, पण ज्याला ऐकू यायचं त्याला ऐकू येतंच, अगदी भगवंतासारखंच.

त्या दिवशीची घटना वाचून मन अस्वस्थ झालं. एकतर्फी प्रेमातून मुलीला सतत त्रास देणाऱ्या त्या सुसंस्कृत शिक्षित कुटुंबातल्या मुलाच्या प्रेमाबद्दल, त्याच्या मनोवृत्तीबद्दल, त्याच्या जडणघडणीबद्दल मन विचार करायला लागलं. एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, ती आपली असावी.. हा विचार मनात येणं अगदी स्वाभाविक आहे, पण ती आपली झाली नाही तर पिसाळून तिलाच त्रास देणं ही कसली वृत्ती? हे कसलं प्रेम?

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
How Sugar Can Harm Liver
तुम्ही खाल्लेली साखर, फळे, हवाबंद पदार्थ यकृतावर कसा परिणाम करतात? डॉक्टरांनी सांगितलं, ‘साखरेच्या कराचं’ महत्त्व
Marathi dancer ashish patil will work with Sanjay Leela Bhansali
‘या’ मराठमोळ्या नृत्यदिग्दर्शकाला मिळाली संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याची संधी; म्हणाला, “माझे अश्रू अनावर…”
How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग

फुलांवरि भ्रमर पाय ठेविती सुकुमार

कुचम्बेल केसर इये शंके..

माउली म्हणतात, अहो, तो भुंगा बघा, एरवी इतकी दांडगाई करतो पण फुलांवर उतरताना मात्र किती अलगद उतरतो.. का? तर त्या फुलातले केसर नाजूक आहेत, आपल्या घाईघाईने पंख हलवण्याच्या धांदलीत ते केसर तुटून पडले म्हणजे.. (तुटून पडणे.. हे शब्द आपले.. माऊली त्यालाही कुचम्बेल असं गोडव्याने भारलेलं क्रियापद वापरतात.) हे प्रेम.. दांडगाईलासुद्धा जिथे नाजूक व्हावंसं वाटतं ते प्रेम.. कुठे ती पहिली घटना आणि कुठे हा निसर्गातला माऊलींनी दिलेला दृष्टांत.. निसर्गाकडे इतक्या तन्मयतेनं, प्रेमानं पाहिलं तर कळणार ना हे प्रेम.. ती आवड ही नाही सवड ही नाही, असे मन.. विचार समृद्ध करणारे ग्रंथही घरात नाहीत, मुळात अभ्यास, क्लास, गुण, स्पर्धा, या सगळ्यात असल्या जुन्यापुराण्या ग्रंथांकडे बघायला मुलांना आणि पालकांना तरी वेळ कुठेय? रोजच्या मालिकांमुळे आजी-आजोबांना तरी वेळ कुठेय? मुळात आजी-आजोबाच कुठेत? प्रेमासारख्या हळुवार भावनेविषयी घरात चर्चा कुठे आहेत? शिवाय प्रेम म्हणजे हक्क, अधिकार असंही चित्र असतं काही ठिकाणी.

मुलाने त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न केलं तर ‘आपल्या प्रेमाची किंमतच नाही आपल्या मुलाला’ असं आईला वाटायला लागतं.. ‘लहानाचा  मोठा केला, त्याला सगळं मिळावं म्हणून आम्ही आमच्या हौशीमौजींना मुरड घातली, इतकं प्रेम केलं त्याच्यावर, पण..’ असे उद्गार अनेक घरांतून ऐकू येत असतात. करतात ना.. आई-वडील सगळं करतात आपल्या मुलांसाठी, प्रेमाने करतात, पण प्रेम करता करता त्या प्रेमाचं रूपांतर नकळत हक्कात, अधिकारात कधी होतं हे कळतही नाही. खऱ्या प्रेमाची परीक्षा कधी असते? तर आपण ज्याच्यावर प्रेम केलं ती व्यक्ती आपल्या मनाच्या आणि मताच्या विरुद्ध वागते तेव्हा.. ‘इतकं प्रेम केलं पण त्याला आहे का काही?..’ असा विचार मनात आला की समजावं प्रेम हक्कात बदललंय.. जर माझं खरंच प्रेम असेल तर त्याला ज्यात आनंद मिळतोय त्यातच मला आनंद वाटेल, भले ते माझ्या मनासारखं नसेल.. प्रेमाचं बंधन वेगळ्या प्रकारचं असतं.. खरं प्रेम करणारा दुसऱ्याला बांधून ठेवत नाही, तर याच्या निरपेक्ष प्रेमाला भुलून दुसरा स्वखुशीने बांधला जायला तयार होतो ते प्रेमबंधन.. मनापासून खरं प्रेम करूनही त्या प्रेमरज्जूत दुसऱ्याचा पाय बांधून न ठेवणं ही एक कला आहे. नुसतं तेवढंच नाही तर प्रेम चारचौघांत दाखवूही नये.. ते सूचक असावं. ही त्या कलेतली पुढची पायरी.. ते फक्त आपल्याला आणि समोरच्याला कळावं. मग ते प्रेम पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, आई-मुलगा किंवा अगदी भक्त-भगवंत यातलं असो. कुठल्या तरी एका हिंदी चित्रपटात सुंदर वाक्य आहे, ‘प्यार करो तो जताओ मत..’

त्या पंडित पत्नीची गोष्ट आठवली.. पंडिताचं लग्न झालं.. पण तो त्याच्या अध्ययनात आणि ग्रंथलेखनात इतका बुडून गेला की त्याला अवतीभोवतीच्या जगाचा विसरच पडला, बारा वर्षांनंतर त्याचा ग्रंथ पूर्ण होत आला.. एका संध्याकाळी अंधार पडत असताना एक स्त्री हातात दिवा घेऊन तिथे आली. तिने त्याच्या लेखनमेजापाशी दिवा ठेवला. पंडिताने मान वर करून पाहिलं आणि आश्चर्याने तिला विचारलं, ‘‘देवी आपण कोण?’’ तिने शांतपणे उत्तर दिलं, ‘‘मी तुमची पत्नी.’’ बारा र्वष त्याचा ग्रंथ पूर्ण होईपर्यंत त्याच्या सगळ्या दैनंदिन गरजांची काळजी त्याच्यावर प्रेम करणारी त्याची पत्नी अगदी मनापासून घेत होती.. तेही स्वत:चं अस्तित्व जाणवू न देता.. हे उदाहरण टोकाचं असलं तरी मुद्दा स्पष्टीकरणार्थ योग्य..

प्यार तो ऐसा किजीये जैसे चंद्र चकोर

चोंच तुटे भुई मां गिरे चित्त तो वा ही ओर

प्रेम चकोरासारखं करावं. चकोर आपल्यावर प्रेम करतो हे चंद्राला माहीतही नसतं, पण चंद्र उगवला नाही तर कळवळून चकोर प्राण सोडतो, पण प्राण सोडतानाही त्याचं सगळं लक्ष, समर्पण त्या चंद्रापाशीच असतं..

..स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करू न देणे हा प्रेमातला एक भाग आणि दुसऱ्याचं अस्तित्व हिरावून न घेणे हा दुसरा भाग. बुद्धांनी म्हटलं होतं ‘फूल आवडतं तेव्हा स्वत:साठी तुम्ही ते तोडून घेता, पण जेव्हा तुमचं फुलावर प्रेम असतं तेव्हा तुम्ही ते तोडत नाही तर त्याची निगा राखता.’

प्रेमाची आणखी एक गम्मत म्हणजे.. राग दाखवल्याशिवाय कळत नाही म्हणजे आपण शांत राहिलो तर आपला आतला राग कधीच समोरच्याला कळत नाही.. पण अनुराग मात्र न दाखवताच कळतो..

एका गावात एक मौलवी होता, रोज सकाळी मशिदीवर चढून तो मोठ्ठय़ा आवाजात बांग द्यायचा. त्या मशिदीत एक सेवक कामाला होता. तो मुका होता. मौलवी दिवसभरात एकदा तरी त्याच्या मुकेपणाची कीव करायचा. म्हणायचा, ‘‘काय रे तुझा जन्म? खुदाचं नावपण नाही उच्चारू शकत. दुर्दैव! दुसरं काय?’’ एक दिवस खुदा त्याच्या मशिदीत येतो. मौलवी इतका खूश होतो, आपल्या रोजच्या प्रार्थनेचंच फळ आहे हे असा अभिमानही वाटतो त्याला. आपल्या शिष्यांना तो म्हणतो, ‘‘बघितलं? असं प्रेम करावं लागतं.. इतक्या मोठय़ाने हाक मारावी लागते त्याला. जा त्या मुक्याला सांगा माझ्या बांग देण्याने खुदा आलाय.. घे म्हणावं काही न करताच दर्शन..’’ इतक्यात खुदा त्या मौलवीपाशी येतो आणि तो मुका सेवक कुठे आहे? असं विचारतो. ‘‘मी तुझ्यामुळे नाही तर त्याच्या प्रेमाला भुलून इथे आलोय.’’ मौलवी आश्चर्याने विचारतो, ‘‘त्याच्या प्रेमाला भुलून? त्याला तुझं नाव तरी उच्चारता येतं का? तो बांग तरी देतो का?’’ खुदा हसत हसत म्हणतो, ‘‘तू इतक्या मोठय़ाने बांग देतोस.. मला बहिरा समजलास काय? तुझ्या पाच वेळा हाका मारण्याने मी प्रसन्न झालेलो नाही. ज्याला बोलताच येत नाही, पण ज्याच्या मनात फक्त माझाच विचार सुरू असतो. त्याच्या प्रेमाने मला इथं आणलाय. त्याचं मुकेपणही मी ऐकू शकतो.’’ प्रेमाचं नाणं वाजवावं लागत नाही. ते वाजतंच! आणि ते वाजलेलं जगाला कळत नाही, पण ज्याला ऐकू यायचं त्याला ऐकू येतंच. अगदी भगवंतासारखंच. इतरांच्या नकळत भगवंत जसा खोळ बुंथी घेऊन येतो.. पण ज्याला सांगायचंय त्याला आपल्या येण्याच्या खुणा अचूक  देतो, शब्दावाचून संवाद करतो.. प्रेमही असंच असतं.

भगवंत हाती आल्यावर जसं त्याला प्राणपणाने सांभाळून ठेवायचं असतं, तसंच लाभलेल्या प्रेमालाही.. या दोघांनाही जपण्याचा मार्ग एकच.. तो म्हणजे ‘मी’ हरवून जाणे..

प्रेमगली अति साकरि ज्या में दो ना समाय

जब मैं था तब हरी नाही अब हरी है तो मैं नाही..

प्रेमाची आणि देवाकडे पोहोचण्याची वाट फार अरुंद असते.. कोणी तरी एकच उभं राहू शकतं.. तो किंवा मी.. निर्णय आपण करायचा असतो..

धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com