देशभक्तीपर चित्रपट म्हटल्यावर आजही अनेकांच्या डोळ्यासमोर येणारे पहिले नाव म्हणजे जे. पी. दत्ता दिग्दर्शित 'बॉर्डर'. हा मल्टीस्टारर चित्रपट प्रदर्शित होऊन १३ जून रोजी २२ वर्ष पूर्ण झाली. १९९७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहताना आजही डोळ्याच्या कडा पाणावतात. भारत-पाकिस्तान युद्धाची कथा असणाऱ्या या चित्रपटाचे अनेक किस्से लोकप्रिय आहेत. आज या चित्रपटाला २२ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जाणून घेऊयात असेच १५ भन्नाट गोष्टी. १) १९९७ साली बॉर्डर हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. २) या चित्रपटा ला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ३) चित्रपटाचे दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांनी चित्रपटा बनवण्याआधी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची परवाणगी मागितली होती. त्यावेळी राव यांनी 'हा चित्रपट नक्कीच तयार करायला हवा' असं म्हणत चित्रपटाच्या निर्मितीला पाठिंबा दिला होता. ४) चित्रपटाची कथा लिहिताना दत्ता यांनी आपल्या भावाच्या दैनंदिनीचा आधार घेतला होता. भारतीय हवाई दलामध्ये वैमानिक म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या भावाने आपले अनुभव दैनंदिनीमध्ये लिहून ठेवले होते. भावाच्या मृत्यूनंतर त्यांनी ही दैनंदिनी वाचली. त्याचा फायदा त्यांना कथा लिहिताना झाला. ५) जे. पी. दत्ता यांचा पहिला चित्रपटाही युद्धावर आधारीत होता. 'सरहद' असे या चित्रपटाचे नाव होते. एका युद्धकैद्याची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. ६) बॉर्डर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दत्ता यांना जीवे मारण्याच्या अनेक धकम्या आल्या होत्या. त्यामुळेच त्यांच्या सुरक्षेसाठी दोन सशस्त्र अंगरक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळजवळ तीन ते चार महिन्यांनी या अंगरक्षकांचे सुरक्षा कवच घेऊनच दत्ता सार्वजनिक ठिकाणांना भेट द्यायचे. ७) या चित्रपटामध्ये सनी देओलने भारतीय लष्करामधील अधिकारी असणाऱ्या कुलदीप सिंग चांदपूरी यांची भूमिका साकारली होती. लाँगेवाला येथील लढाईमध्ये कुलदीप यांनी आपल्या नेतृत्वाअंतर्गत भारताला विजय मिळवून दिला होता. या लढाईमधील कामगिरीसाठी त्यांना भारतीय लष्कराकडून 'महा वीर चक्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ८) चित्रपटातील विंग कमांडर अॅण्डी बजवा या जॅकी श्रॉफने साकारलेल्या भूमिकेसाठी संजय दत्तकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र संजय दत्तला तुरुंगवासाची शिक्षा झाल्याने त्याच्या ऐवजी जॅकी श्रॉफला ही भूमिका मिळाली. ९) लेफ्टनंट धरमवीरची भूमिका साकारण्यासाठी सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, अजय देवगण आणि सैफ अली खान यांना यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र सलमानने या भूमिकेला नकार दिला, आमीर 'इश्क'च्या चित्रिकरणात व्यस्त होता, सैफ आणि अक्षयनेही भूमिकेला नकार दिला तर अजय देवगणला मल्टीस्टारर चित्रपटामध्ये काम करायचे नसल्याने त्यानेही भूमीका नाकारली. अखेर ही भूमिका अक्षय खन्नाने साकारली. १०) या चित्रपटासाठी मनीषा कोईरालाही करारबद्ध करण्यात आले होते. मात्र नंतर तिने चित्रपट करण्यास नकार दिला. ११) सनी देओलने साकारलेल्या कुलदीप सिंग चांदपूरी यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी जुही चावलाकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र तिने ही भूमिका अगदील कमी कालावधीसाठी असल्याने तिने ही भूमिका साकारण्यास नकार दिला. ही भूमिका नंतर तब्बूने साकारली. १२) या चित्रपटाचे सर्व चित्रिकरण बिकानेरमध्ये १९७१ साली वाळवंटात झालेल्या युद्धातील युद्धभूमीवरच करण्यात आले होते. १३) या चित्रपटातील युद्ध दृष्यांसाठी खरी हॉकर्स हंटर विमाने वापरण्यात आली. खऱ्याखुऱ्या युद्धामध्येही याच विमानांचा वापर करण्यात आला होता. या विमानांवरील युनीटचे लोगोही चित्रपटात दिसतात. १४) या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये खऱ्या सैनिकांनी सहभाग घेतला होता. चित्रपटातील अनेक गोष्टी खऱ्या युद्धभूमीवरीलच होत्या. यामध्ये अगदी रणगाडे, लष्कारी वहाने आणि काही शस्त्रास्त्रेही खरी होती. १५) बॉर्डर या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याचे घोषणा जे. पी. दत्ता यांनी २०१३ साली केली होती. या चित्रपटानंतरही अनेक देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शित झाले मात्र या चित्रपटाने कायमच प्रेक्षकांना मनावर अधिराज्य गाजवले असून यापुढेही या चित्रपटाची जादू कायम राहिलं असेच याच्या लोकप्रियतेवरुन म्हणता येईल.