नववर्ष साजरे करून मोठय़ा आनंदात परतलेल्या कतरिनाला मुंबईत पोहोचल्या पोहोचल्या पुन्हा एकदा वास्तवाचे चटचे जाणवायला लागले आहेत. रणबीर आणि तिने न्यूयार्कमध्येच वाङ्निश्चय उरकला आहे इथपासून ते आता लवकरच कपूर खानदान याबाबतची अधिकृत घोषणा करणार, अशा अनेक चर्चाचे मोहोळ उठले आहे. मात्र, याबाबतीत त्या दोघांनीही एक अवाक्षरही काढलेले नसतानाही पुन्हा एकदा रणबीर आणि तिच्या लग्नाबद्दल दीपिकाकडून कानपिचक्या ऐकण्याची वेळ कतरिनावर आली आहे. 

दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर दोघेही वेगळे होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. दीपिकाने रणवीरशी जुळवून घेतले आहे, तर रणबीरही कतरिनाबरोबर एकत्र राहतो आहे. असे असतानाही रणबीरचा विषय निघाल्यानंतर दीपिका आजही कतरिनाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काही सुनावण्याची संधी वाया जाऊ देत नाही. आत्ताही अशाच एका जाहीर सोहळ्यात तिने कतरिनाला लक्ष्य केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील तमाम कलाकारांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात दीपिकाला नव्या वर्षांसाठी केलेल्या संकल्पांबद्दल गमतीशीर उत्तरे देण्यास सांगण्यात आले होते. या प्रश्नोत्तरांच्या दरम्यान तू कतरिनाला काय सल्ला देशील, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नावर कतरिनाने रणबीरशी लग्न करू नये, असे उत्तर दीपिकाने दिले. दीपिकाचे हे विधान वाऱ्यासारखे सगळीकडे पसरल्याने कतरिनाच्या आनंदाचे काय झाले असेल, याची कल्पनाच केलेली बरी..
प्रकरण इथेच थांबले असते तर ठीक होते. मात्र दीपिकाने असे विधान केलेले नाही. तिच्या बोलण्याचा विपर्यास केला जात असल्याचे पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ‘तू कतरिना असतीस तर काय केले असतेस? असा प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला होता आणि त्यावर तिने मी रणबीरशी लग्न केले असते, असे उत्तर दिल्याचे आता सांगितले जात आहे. दीपिकाने दोन्हीपैकी कोणतेही विधान केले असले, तरी तिच्या या कानपिचक्यांनी कतरिनाच्या रागात भरच पडणार आहे. याआधीही दीपिकाने ‘कॉफी विथ करन’ असेल नाही तर कतरिना आणि रणबीरच्या छायाचित्रांवरून उडालेला गोंधळ असेल.. प्रत्येक वेळी तिला जाहीर कानपिचक्या देण्याचे काम केले आहे. कतरिनानेही जमेल तेवढे प्रत्युत्तर करत आपला राग वेळोवेळी व्यक्त केला आहे. तरीही एकीकडे तिने रणबीरबरोबर नव्या आयुष्याची सुरुवात केली असताना तिला वेळोवेळी टीकेचे धनी व्हावे लागले आहे. खास करून दीपिका, रणबीर आणि कतरिना हा प्रेमत्रिकोण चर्चेचा विषय असल्याने तर तिचा त्रास आणखीनच वाढला आहे.