बॉलिवू़डचा खिलाडी अक्षय कुमारच्या फिटनेसची चर्चा तशी नवी नाही. त्याचा फिटनेस तरुणाईसाठी प्रेरणादायी असल्याचे कोणीही सहज मान्य करेल. बॉलिवूड क्षेत्रात त्याच्या वयाचे कलाकार फिटनेसच्या बाबतीत अक्षय कुमार समोर चक्क गुडघे टेकतात अशाही चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगत असतात. फिटनेसच्या बाबतीत बोलायचे तर कलकलाकार असो किंवा सामान्य व्यक्ती शारिरिक तंदुरुस्तीसाठी अफाट मेहनत ही  घ्यावीच लागते. फिटनेसला कोणताही शोर्ट कट नसतो. अक्षय देखील ही गोष्ट चांगलीच पाळतो. बॉलिवूडचा खिलाडी फिटनेसवर कष्ट घेत असल्यामुळेच त्याच्या वयाच्या कलाकारांपेक्षा तो अधिक तंदुरुस्त दिसतो. अक्कीने फिटनेस कमावण्यासाठी अधिक वेगळे असे काही केलेल नाही. तर साधारण पद्धतीने जीवन शैलीतूनच त्याने आपले व्यक्तीमत्व प्रेरणादायी  बनविले आहे. नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये अक्षय कुमार फिटनेसविषयी माहिती देताना दिसला.

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘जॉली एल एल बी २’  च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अक्षय कुमारने शारिरिक तंदुरुस्तीबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर केल्या. फिटनेसबद्दल बोलायचे झाले तर मी एक खंड लिहू शकतो, असे तो म्हणाला. शारिरिक तंदुरुस्तीसाठी मी कोणताही प्रकारचा डाएट करत नाही. सामान्य लोकांच्या प्रमाणेच माझा देखील साधारणच आहार आहे.  इतर लोकांपेक्षा मी काहीही वेगळा आहार घेत नाही, असे अक्षय यावेळी म्हणाला. माझ्या आहारामध्ये विशेष असे खाद्य नसते, मात्र आहार घेण्यासाठी ठरविलेल्या वेळसंदर्भात मी  कोणतीही तडजोड करत नाही. असे अक्कीने स्पष्ट केले. मी दररोज ६.३० च्या ठोक्याला जेवण करतो. ही वेळ कोणत्याही परिस्थितीत मागे पुढे होणार नाही याची दक्षता घेतो, असेही अक्षयने सांगितले. दरम्यान आहाराच्या नियोजित वेळेप्रमाणेच  एक ते दिड तास व्यायाम करणे हा देखील  माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग असल्याचे अक्की म्हणाला. या जीवन शैलीमुळे तुम्हाला डायबेटीस आणि ह्रदयविकारासारख्या आजारापासून अलिप्त राहणे सहज शक्य असल्याचा विश्वासही अक्षयने यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, बॉलीवूडचा हा आघाडीचा अभिनेता लवकरच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत  झळकणार आहे. ‘जॉली एलएलबी ’ या सुभाष कपूर दिग्दर्शित चित्रपटाच्या  सिक्वलमध्ये अक्षय कुमार जॉलीच्या म्हणजेच जगदीश्वर मिश्राच्या मुख्य भूमिकेत आहे. याआधीच्या चित्रपटात जॉलीची भूमिका अभिनेता अर्शद वारसीने केली होती. मात्र सिक्वलमध्ये अक्षय कुमारची वर्णी लागली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार मराठीकडे वळला आहे. ‘तुझ्यात जीव गुंतला’ या मालिकेची निवड केली आहे. आता लखनौमधला जगदीश्वर मिश्रा आणि कोल्हापूरचा राणा यांची भेट होणार कशी? हा या कथेचा गमतीचा भाग ठरणार आहे.