चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने सोशल मिडीया साइट ट्विटरवर दिलीप कुमार यांचे निधन झाल्याचे ट्विट केले होते. मात्र, त्याला दिलीप कुमार यांच्या स्वास्थ्याबाबतची योग्य माहिती कळताच त्याने त्याच्या चुकीच्या ट्विटबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
अनुरागने दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त करणारे ट्विट केले होते. पण, हे ट्विट करताच त्याला लागोपाठा तीन मॅसेज आले. त्यावरून त्याला दिलीप कुमार हे हयात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळले. हे कळताच, अनुरागने त्याचे ट्विट काढून टाकले आणि आपल्या चुकीच्या ट्विटबाबत माफी मागितली आहे.
दिलीप कुमार यांना रविवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिरावली असून त्यांना आराम करण्याची गरज असल्याचे सायरा बानू यांनी सांगितले आहे. तसेच, सायरा बानू यांनी चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेसाठी त्यांचे आभार मानले आहेत आणि दिलीप कुमार यांच्या स्वास्थ्यासाठी अशाच प्रार्थना चालू ठेवण्याची विनंती केली आहे.