‘टारझनः द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आएशा टाकियाच्या सौंदऱ्यावर अनेकजण घायाळ होते. मात्र काही काळ चित्रपटसृष्टीत घालविल्यानंतर तिने चंदेरी दुनियेपासून फारकत घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र सध्या आएशा आणि तिचा पती फरहान चर्चेत आले असून त्यांच्या घरी धमकीचे फोन येत असल्याचं सांगण्यात येत आहे. 'माझ्या घरी माझी पत्नी, आई आणि सात महिन्यांची गरोदर बहीण आहेत आणि त्यांना धमक्यांचे फोन,मेसेज येत आहेत. त्यामुळे मला त्यांची काळजी वाटते. माझ्या घरी येणारे हे फोन माझ्या एका खटल्याशी संबंधित असल्याचं मला वाटत आहे. त्यामुळे कृपा करुन या प्रकरणी आपण लक्ष घाला, असं ट्विट फरहानने केलं आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांनादेखील टॅग करत त्यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. My wife @Ayeshatakia , mother & sisters are being harassed,threatened stalked by a litigant, @MumbaiPolice #dcpDahiya refusing to answer my calls or messages. #DahiyaIPS has illegally frozen our bank accounts Dear PM @narendramodi ji @SushmaSwaraj Pls intervene!! #betibachao — Farhan Azmi (@abufarhanazmi) July 3, 2018 आएशाचा पती फरहान आझमी याचा बिझनेस पार्टनर असलेल्या काशिफने फरहानवर फसवणुकीचा आरोप केला होता. तसंच त्याने फरहानवर बांद्रा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हादेखील दाखल केला होता. याप्रकरणानंतर फरहानच्या घरी धमकीचे फोन आणि मेसेज येऊ लागले आहेत. त्यामुळे येणारे हे फोन याच खटल्याशी संबंधित असल्याचं मत फरहानने व्यक्त केलं आहे. दरम्यान, फरहानने एका पाठोपाठ काही ट्वीट केले असून त्यामध्ये डीसीपी परमजीत सिंह दहिया यांनी फरहानच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचे फोन उचलले नाहीत असे आरोप केले आहेत. विशेष म्हणजे डीसीपी दहिया यांच्याशी झालेल्या चर्चेचे काही स्क्रीनशॉटही त्याने पोस्ट केले आहेत. या पोस्टनंतर फरहानला सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनी फोन करत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. भारती यांच्या फोननंतर फरहानने पुन्हा एक ट्वीट करत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहे.