काही कलाकारांची एक झलकही प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यास यशस्वी ठरते. अशाच कलाकारांमध्ये सध्याच्या घडीला आघाडीवर असणारा अभिनेता म्हणजे ‘बाहुबली’ फेम प्रभास. एस.एस.राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही भागांमधून देशोदेशीच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रभास हा खूपच समंजस असून, कारकिर्दीत इतके यश मिळवूनही त्याला आपल्या परिस्थितीची आणि भूतकाळाची जाण आहे. प्रभासच्या वागण्याबोलण्यातून कधीच अवाजवी मोठेपणा आणि बडेजावपणा पाहायला मिळत नाही. आपल्या चाहत्यांनाही तो नेहमीच प्राधान्य देतो. अशा या अभिनेत्याने नुकतेच एका मुलाखतीत काही गोष्टींवरुन पडदा उचलला आहे.

चित्रपट निर्मात्यांच्या कुटुंबातून आलेल्या प्रभासनेही आर्थिक अचडणींचा सामना केला आहे. त्याविषयीच ‘जीक्यू’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रभासने माहिती दिली. ‘मी महाविद्यालयीन दिवसांमध्ये बसनेही प्रवास केला आहे. चित्रपट निर्मात्यांच्या कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या मुलाने बसने प्रवास करणे ही बाब इतरांसाठी खूप मोठी होती. कारण, मी बसमध्ये जायचो तेव्हा अनेकांच्या नजरा माझ्यावर खिळलेल्या असायच्या. हा तर मोठ्या कुटुंबातील मुलगा आहे, असा लोकांच्या बोलण्याचा रोख असायचा. त्यामुळे एका अर्थी मी जास्तच मेहनत करु लागलो आणि कुठेतरी या सर्व गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरल्या’, असे प्रभास या मुलाखतीत म्हणाला.

वाचा : पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

पदार्पणाच्या चित्रपटात स्वत:ला रुपेरी पडद्यावर पाहून भावूक होणाऱ्या प्रभासने सुरुवातीच्या काळात अपयशाचा सामनाही केला. पण, अपयशाने खचून न जाता त्याने जिद्दीने आपले अभिनय कौशल्य आणखीनच खुलवत चित्रपटसृष्टीत आपले स्थान प्रस्थापित केले. येत्या काळात प्रभास ‘साहो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यामागोमागच तो बॉलिवूड पदार्पणासाठीसुद्धा सज्ज झाल्याचे कळते आहे.