तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. यात मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी चित्रपट 'टायगर ३' च्या सेटचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामूळे येणाऱ्या दिवसात या चित्रपटाची जी शूटिंग करण्यात येणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. 'टायगर ३' चित्रपटात दुबईमधला बाजार शूट करण्यासाठी गोरेगावमधल्या एसआरपीएफ ग्राउंडवर भलामोठा सेट उभारण्यात आला होता. तौक्ते चक्रीवादळात हा भलामोठा सेट उडून गेला. सुदैवाने सध्या मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगवर बंदी घातल्यामुळे यावेळी इथे कोणतीही शूटिंग सुरू नव्हती. त्यामूळे इथे जास्त कुणाचा वावर नसल्यामुळे यात कुणालाही दुखापत झालेली नाही. परंतू चित्रपटाच्या मेकर्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसंच येणाऱ्या काही दिवसांत जी शूटिंग होणार होती ती देखील पुढे ढकलल्यामुळे या चित्रपटाचं शेड्यूल देखील हललं आहे. View this post on Instagram A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) ज्यावेळी महाराष्ट्रात चक्रीवादळाची घोषणा करण्यात आली होती, त्यानंतर काही फिल्ममेकर्सनी आपल्या चित्रपटाच्या सेट्सना कवर कऱण्यासाठी काही मजूर त्या ठिकाणी पाठवले होते. यासंदर्भात बोलताना FWICE चे अध्यक्ष बीएन तिवारी म्हणाले की, चक्रीवादळामुळे फिल्म सिटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. निदान सध्याच्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे शूटिंग बंद होत्या. त्यामुळे केवळ मालमत्तेचं नुकसान झालंय. कुणाला इजा झाली नाही. संजय लीला भन्साळी त्यांची आगामी फिल्म 'गंगूबाई काठियावाड़ी'च्या सेटला तर वाचवू शकले. गेल्याच वर्षीच्या पावसाळ्यात त्यांनी त्यांच्या सेटला कवर केलं होतं. 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' नंतर 'टायगर ३' हा तिसरा सिक्वेल आहे. सलमान खानच्या चाहत्यांना त्याच्या या चित्रपटासाठी उत्सुकता मोठ्या प्रमाणात आहे. २०२२ च्या ईद निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित होणार असं बोललं जातंय. परंतू अद्याप या चित्रपटाच्या रिलीजबाबतीत कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.